राज्यावरील वीज टंचाईचं संकट दूर करण्यात काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारला काही प्रमाणात यश आलं. त्यामुळे भारनियमनामधून सुटका होईल अशी अपेक्षा असतानाच आता देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईसहीत उपनगरांमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या ४०० केव्हीच्या पारेषण वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. हा बिघाड झाल्याने आज (२६ ए्प्रिल २०२२ रोजी) सकाळी साडेदहाच्या सुमारास मुंबई व ठाणे डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.

कळवा पडघा येथील वीजपुरवठा केंद्रामध्ये हा बिघाड झाला आहे. त्यामुळे दादर, माहीम, वांद्रे, सांताक्रुझ आणि इतर भागांमधील वीजपुरवठा खंडित झालाय. ठाणे आणि कळव्यामध्येही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झालाय. दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत करण्याचं काम हाती घेण्यात आलं असून वीजपुरवठा खंडित झालेल्या भागांमध्ये टप्प्याटप्प्यांत वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम सुरु आहे.

महापारेषणच्या पडघा येथील उच्च दाब वीजवाहिनीत बिघाड झाल्याने डोंबिवली, कल्याण. बदलापूर, अंबरनाथ शहरांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. कुर्ला, चेंबूर, वाशीसहीत पालघरमधील संपूर्ण विभागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक ठिकाणी अर्ध्या तासानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.