ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम पहिल्या टप्प्यात कार्यालयात सुरू असताना गर्दीचा फायदा उठवत एका चोराने उमेदवारांची भरलेली अनामत रकमेची बॅगच लंपास करण्याचा धक्कादायक प्रकार मिरजेत घडला. या प्रकरणी संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्यांने शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूध्द चोरीची तक्रार दाखल केली आहे. हेही वाचा- “पवनराजेंच्या मुलाशी ‘सामना’ झाला अन् आगीशी…”, निंबाळकरांनी पाटलांना डिवचलं; म्हणाले, “कधीही भिडायला तयार” ग्रामपंचायत म्हणजे गावपातळीवरील मिनी मंत्रालय. या मंत्रालयाची सत्ता आपल्या हाती असावी ही सूप्त इच्छा मनी धरून अनेक कार्यकर्ते निवडणुकीची तयारी करत असतात. ग्रामपंचायतीचे कर, सरकारी देणे यांचा भरणा केल्यानंतर अनामत रकमेसह उमेदवारी अर्ज दाखल केला जातो. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या अर्जासोबत अनामत रक्कम भरण्यात येते. गावपातळीवरील संभाव्य इच्छुकांची आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी लक्षात घेउन मिरज तहसिल कार्यालयाकडून वैरण बाजार येथील शासकीय गोदामात तात्पुरते निवडणुक कार्यालय सुरू केले असून या ठिकाणी 25 ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र कक्ष आणि स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांचे अस्थायी विभाग आहेत. हेही वाचा- यवतमाळमध्ये एसटी बस आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, १३ प्रवासी गंभीर जखमी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करत असताना अनामत म्हणून जमा करण्यात आलेली ७ हजार २०० रूपयांची रोकड एका पिशवीत ठेवून टेबलजवळ ठेवण्यात आली होती. दुपारी २.५८ ते २.५९ वाजण्याच्या सुमारास अवघ्या एक मिनीटाच्या अवधीत अज्ञात शार्विलकाने पैशाची पिशवीच गायब केली. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी सदाशिव मगदूम यांनी शनिवारी सायंकाळी मिरज शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूध्द चोरीची तक्रार दाखल केली असून पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहेत.