अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात कुठलेही मतभेद नाहीत. एक लक्षात घ्या या गोष्टीबाबत अजित पवार यांनीही भूमिका मांडलेली आहे. जेव्हा जयंत पाटील यांना ईडी चौकशीसाठी बोलवण्यात आलं तेव्हा जयंत पाटील हे निर्दोष आहेत त्यांची काहीही चूक नाही असं सांगणारा मी पहिला होतो. अजित पवारांनी जरी त्यांना फोन केला नाही तरी त्यांची आणि जयंत पाटील यांची चर्चा होत असते, भेटी होत असतात त्यामुळे त्यांच्यात मतभेद असण्याचं काहीच कारण नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडीमध्ये सगळेच भाऊ आहेत. मोठा कोण आणि लहान भाऊ कोण? हे कशावरुन ठरवायचं? तिन्ही पक्षांचे जे कार्यकर्ते असतील त्यांना सांगायचं आहे की तिन्ही भावांचे प्रतिनिधी एकत्र बसतील आणि पुढचं सूत्र ठरवतील. तसंच कोण कुठे जागा लढवेल हे ठरवतील. मात्र मुख्य बाब हीच असणार आहे की कुठला उमेदवार कुठल्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या तिकिटावर निश्चित विजय मिळवेल. हे मुख्य सूत्र असणार आहे. त्यामुळे दोन-चार जागा जास्त मिळतील कुणाला कमी मिळतील. पण एकत्र राहिल्याने महाविकास आघाडी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दैदीप्यमान यश मिळेल असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुख यांचा दावा काय आहे तो मी ऐकलेला नाही. पण त्यांनी दावा केला तर ते स्पष्टीकरण देतील. मला याची काही कल्पना नाही. पण एक आहे की भाजपामध्ये एखादा माणूस गेला की त्याच्यासहीत मशीनमधून तो धुवून निघतो. नव्या संसद भवनाबाबत मी बोलणं योग्य नाही कारण मी खासदार नाही. जुनं संसद भवन या भवनाला इतिहास आहे. अशात नवं संसद भवन आणलं जातंय तरीही देशाच्या राष्ट्रपतींना या सोहळ्याचं निमंत्रण नाही ही बाब योग्य नाही असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.