नारायण राणेंसारखे भित्रे मंत्री राहिले नाहीत. राणे घाबरले म्हणून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांना काही बक्षिस मिळाले नाही म्हणून काहीही बोलतात अशी टीका राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केलेल्या टीकेला नवाब मलिक यांनी उत्तर दिले आहे.

“नवाब मलिक यांना राष्ट्रवादीने सोडून दिले आहे. त्यांच्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्यांच्या जावयाकडे काय मिळाले हे सर्वांना माहित आहे. तरीही नवाब मलिक बोलत आहेत. आघाडीचे अनेक मंत्र्यांना अटक होणार आहे. त्याची चिंता कर डायलॉगबाजी करु नका,” असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. त्यावर आता नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“महाराष्ट्र सरकार टिकणार नाही असे वारंवार बोलत राहिले. आधी पंधरा दिवस, नंतर दोन महिने आणि आता वर्षभर अशी तारीख पे तारीख सुरु होती. हे सरकार भक्कम आहे. नारायण राणे तुमच्यासारखे भित्रे मंत्री आता राहिलेले नाहीत. जे भित्रे होते ते गेले. आता भाजपा यंत्रणेचा वापर करुन लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे काम करत असेल तर आम्ही घाबरणार नाही. जे घाबरत होते त्यांनी पक्ष सोडला. त्यांना बक्षिसपण मिळाले असेल. पण हे सरकार पाच वर्षे टिकेल आणि २५ वर्षे हेच सरकार राहिल हे मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले होते. जे भित्रे तिकडे गेले त्यांना झोप येते आणि आम्ही लोकांची झोप उडवतो,” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. नारायण राणेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुद्द्यांवर भूमिका मांडली. यावेळी बोलताना त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींवरून त्यांनी या दोघांना लक्ष्य करतानाच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर देखील बोचरी टीका केली.