पारनेर तालुक्यातील अल्पवयीन शालेय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या तिन्ही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. संतोष विष्णू लोणकर (वय ३६), मंगेश दत्तात्रय लोणकर (३०) दत्तात्रय शंकर शिंदे (२७) अशी त्यांची नावे आहेत.

२०१४ सालच्या ऑगस्टमध्ये पारनेर तालुक्यातील आळकुटी येथील शाळकरी मुलगी परीक्षा देऊन घरी जात असताना सायंकाळच्या सुमारास पाऊस आला म्हणून ती जवळच्याच एका पुलाखाली आश्रयाला थांबली होती. या वेळी तिच्या पाठलागावर असलेल्या तिघांनी तिला शोधून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी तिचा नंतर खून केला होता. या प्रकाराने पारनेर तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पारनेर पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक शरद जांभळे यांनी तपास करून चार दिवसांत तिघा आरोपींना अटक केली होती. यात त्या वेळी पोलिसांनी ५५ जणांच्या साक्षी नोंदवल्या. आरोपींकडूनही गुन्हय़ात वापरलेल्या अनेक वस्तू आरोपींकडून जप्त करण्यात आल्या होत्या. तपासाअंती या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सूचनेनुसार राज्य सरकारने या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. या खटल्यात साक्षीदार, डॉक्टर, पोलीस, मैत्रिण आणि वडील यांसह एकूण ३२ जणांची साक्ष नोंदविण्यात आली होती. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींविरोधात न्यायालयात २४ पुरावे सादर केले होते. त्याआधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी तिघांना फाशीची शिक्षा सुनावली.