चंद्रपूर : ब्रह्मपुरी वन परिक्षेत्रात चार जणांचे बळी घेणाऱ्या टी १०३ एसएएम - १ या वाघाला गुरुवारी सकाळी जेरबंद करण्यात आले. या वाघाने २८ जून, १६ व १७ ऑगस्ट रोजी तिघांचे बळी घेतले. त्यापूर्वी याच वाघाने एकाला ठार केले होते, असे सांगितले जाते. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष होता. या पार्श्वभूमीवर वनविभागाने परिसरात बंदोबस्त लावला. आज सकाळी वाघ परिसरात भ्रमण करत असल्याचे दिसताच पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव), आरआरटी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर डॉ. रविकांत खोब्रागडे व अजय मराठे, सशस्त्र पोलीस यांनी अचूक निशाणा साधून वाघास बेशुद्ध केले. वाघाचे वय अंदाजे दोन ते अडीच वर्षे असून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे स्थलांतरित करण्यात येईल. वाघाच्या हल्ल्यात दोन ठार भंडारा/चंद्रपूर : वाघाने केलेल्या हल्ल्यात भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील पवनी वनपरिक्षेत्राअंतर्गत सावरला भागात बुधवारी गुरे चारण्यासाठी गेलेल्या रमेश मोतीराम भाजीपाले (५०, रा. सावरला) यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. दुसऱ्या घटनेत बुधवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील काटवन जंगलात वाघाच्या हल्ल्यात गुराखी भाऊराव वतू गेडाम (५५ रा. काटवन) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांचा आज, गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.