आदिवासी भागांतील चालीरीतील प्रथेप्रमाणे दिवाळी सणाचा पहिला दिवस हा ‘वाघबारस’ म्हणून ओळखला जातो. याला वसु बारस म्हणूनही संबोधले जाते. वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा हा मोठा दिवस असून आदिवासींच्या जीवनात या दिवसाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय लोक दिवाळी हा सण वसुबारसेच्या दिवशी करत असतानाच पालघर जिल्ह्यतील आदिवासी भागात मात्र वाघबारस साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही येथील आदिवासी बांधवांनी तितक्याच उत्साहाने जपली आहे. येथील आदिवासी बांधवांनी वाघाला देव मानले आहे. गावाच्या वेशीला असलेल्या वाघ देवाच्या मंदिरात जाऊन मोठय़ा मनोभावाने पूजा केली जाते, हा सण मोठा उत्सवाने साजरा करून सर्वजण एकत्र नवसपूर्ती करतात. जंगलातील हिंस्र प्राण्यापासून पाळीव प्राण्यांची गाई गुरांचे रक्षण व्हावे यासाठी कोंबडा, बोकडाचा नैवेद्य दाखवला जातो, तसेच काही भागात डांगर, तांदळाच्या खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो. वाडा, पालघर, विक्रमगड, जव्हार, मोखाडा तालुक्यातील अनेक गावांत वाडय़ा-वस्त्यांवर वाघ देवाची मंदिरे आजही आहेत. वाघ दारात येऊन गुरगुरतो वाघ बारसेच्या दिवशी येथील प्रत्येक कुटुंबातून वाघाला एक कोंबडा नैवेद्य म्हणून बळी द्यावा लागतो. कबूल केलेला कोंबडा दिला नाही, तर वाघ रात्रीच्या वेळी घरी येऊन कोंबडा पळवतो, त्याचबरोबर कुटुंबाच्या घरातील कोणत्याही व्यक्तीने वाघाच्या वनातून लाकूडफाटा आणला, तर त्याला वाघोबा काहीतरी शिक्षा म्हणून त्याच्या दारात येऊन गुरगुरतो किंवा त्याच्या पाळीव प्राण्यांची शिकार करतो अशी माहिती मौजे पीक येथील आदिवासी समाजातील लाडक्या बरफ या वयोवृद्धाने दिली. काळाच्या ओघात हे सर्व लोप पावत चाललेले दिसते. वाघबारस ही प्रथा नैवेद्यापुरती मर्यादित राहिलेली आहे. - कृष्णा जाधव, स्थानिक आदिवासी शिक्षक, वाडा, जि. पालघर