सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रलंबित असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोल नाका उद्या शुक्रवार, दि. २७ पासून सुरू होणार आहे. राष्ट्रीय महामार्गाची अनेक कामे अद्याप अपूर्णावस्थेत असताना टोल नाका सुरू होत असल्याने सिंधुदुर्गातील जनता आश्चर्य व्यक्त करत आहे. उद्या शुक्रवार, दि. २७ मेपासून ओसरगाव टोलनाक्यावरून टोलवसुली सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ठेका मिळालेल्या एम. डी. करीमुनिसा कंपनीकडून देण्यात आली. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग ६६ ची अनेक कामे अद्याप अपूर्णावस्थेत आहेत. मात्र असे असताना ओसरगाव टोलनाक्यावरून उद्यापासून टोलवसुली सुरू करण्यात येणार आहे. टोल नाक्याच्या परिसरापासून वीस किलोमीटर परिघामध्ये येणाऱ्या वाहनांना मासिक ३१५ रुपयांचा पास देण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त इतर वाहनांना टोल भरावा लागणार आहे. दुचाकी व तीनचाकी गाडय़ांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. तसेच फास्ट टॅग असलेल्या वाहनांना टोलची पन्नास टक्के रक्कम भरावी लागणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या महामार्गावरील कामे पूर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले नाही तसेच अजूनही काही अडचणी आहेत असे सांगितले जात आहे.