शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विश्वासदर्शक ठराव घेण्याचे आदेश दिले आहेत. उद्या विश्वासदर्शक ठरावाबाबत मतदान घेतलं जाणार आहे. या ठरावाला शिवसेनेचे बंडखोर आमदार उपस्थित राहणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण आपण सर्वजण उद्या मुंबईत येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "सर्वप्रथम मी आसामधील लोकांचे आभार मानतो, त्यांनी एका कुटुंबाप्रमाणे आमच्याशी सहकार्य केलं. आम्ही उद्या मुंबईला येणार आहोत. मुंबईत आल्यानंतर आम्ही विश्वासदर्शक ठरावात सामील होणार आहे. विश्वासदर्शक ठरावानंतर आमची आमदारांसोबत बैठक होईल, त्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाईल," असं त्यांनी सांगितलं. बंडखोरीबाबत विचारलं असता ते म्हणाले की, "आम्ही बंडखोर नाहीत, आम्ही शिवसेना आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचा अजेंडा आणि विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. हिंदुत्वाचे विचार आणि राज्याच्या विकासासाठी आम्ही काम करू, असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात आगामी सरकार हे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराचेच असेही ते म्हणाले.