रत्नागिरी : एकल (एकदाच) वापर प्लास्टिकच्या वापरावर येत्या १ जुलैपासून बंदी घालण्यात आली असून या प्रकारच्या प्लास्टिकची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले आहेत. सजावटीसाठी वापरले जाणारे प्लास्टिक व थर्माकॉल, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेट पाकिटावर आवरण म्हणून वापरले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिक काडय़ांनी कान कोरणे, प्लास्टिकच्या काडय़ा, प्लास्टिकचे झेंडे, कॅन्डी, आइस्क्रीम कांडय़ा, प्लास्टिकच्या थाळय़ा, कप, ग्लास व इतर साहित्यांचा या बंदीमध्ये समावेश आहे. एकल प्लास्टिक वापराबाबत जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. एकल वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या विविध वस्तूंऐवजी निसर्गपूरक इतर अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने कापडी पिशव्या, बांबू, लाकडी वस्तू, सिरामिक्सची प्लेट, वाटय़ा आदी चांगले पर्याय आहेत. नागरिकांनी अशा निर्सगपूरक वस्तूंचा वापर अधिकाधिक करावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे. प्लास्टिकच्या वस्तूंपासून पर्यावरणाला अधिक धोका निर्माण होऊ नये, या दृष्टीने यावर पुनप्र्रक्रिया करण्यावर अधिक भर द्यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळचे प्रादेशिक अधिकारी, मुख्यालय प्लास्टिक सेल, नंदकुमार गुरव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राक्षे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी सागर औटी, क्षेत्रीय अधिकारी अमित लाटे, सर्व नगर परिषद, नगर पंचायतींचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी बैठकीला उपस्थित होते. बंदी लागू झाल्यानंतर महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा याचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाईल, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांचा कारावास अशी शिक्षा राहणार आहे.