महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आय. ए. एस. अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात जोरदार कारवाईची मोहीम उघडली आहे. गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने हजारो तपासण्या करून शेकडो आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत.
त्यांच्या या धडक कारवाईचे आता देशाच्या सर्वोच्च अन्न नियामक संस्थेकडून कौतुक करण्यात आले असून ‘फूड सेफ्टी’ विभागातील बदली ही ‘पनिशमेंट पोस्टिंग’ (शिक्षेची बदली) नसते, असा महत्त्वपूर्ण संदेशही देण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचे (FSSAI) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रजित पुन्हानी यांनी इंडिया टुडे वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांच्या धोरणांचे जोरदार समर्थन केले. “‘इच्छा तिथे मार्ग असतो’ हेच तुकाराम मुंढे यांनी आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे,” अशा शब्दांत पुन्हानी यांनी मुंढेंच्या कार्यशैलीची प्रशंसा केली.
‘शिक्षेची बदली’ ही मानसिकताच चुकीची
गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने हजारो तपासण्या करून शेकडो आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना पुन्हानी म्हणाले की, “अनेकदा अधिकारी अन्न सुरक्षा आयुक्त पदावर काम करण्यास उत्सुक नसतात. भूतकाळात या विभागाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याला ‘पनिशमेंट पोस्टिंग’ मानले जायचे. ‘शिक्षेची बदली’ ही मानसिकताच चुकीची आहे.
अन्न सुरक्षा हा तुलनेने नवीन आणि अत्यंत संवेदनशील विषय आहे; मात्र अनेक राज्यांमध्ये या पदाचा अतिरिक्त भार इतर अधिकाऱ्यांवर सोपवला जातो. आता प्रत्येक राज्यात अन्न सुरक्षेसाठी पूर्णवेळ आणि स्वतंत्र आयुक्त असणे ही काळाची गरज बनली आहे, यावर पुन्हानी यांनी भर दिला.
उपलब्ध कर्मचाऱ्यांमध्येच करून दाखवली प्रभावी कारवाई
तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे वैशिष्ट्य सांगताना FSSAI चे प्रमुख म्हणाले, “मुंढे यांनी ही संपूर्ण मोहीम कोणत्याही नवीन पदभरतीशिवाय, उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बळावरच यशस्वी करून दाखवली आहे. अन्न सुरक्षेसाठी नवीन अधिकारी आणले तरच काम होईल हा गैरसमज त्यांनी दूर केला आहे. त्यांच्या या कारवाईमुळे सर्वसामान्यांमध्ये अन्न सुरक्षेचे महत्त्व वाढले असून प्रशासकीय यंत्रणेवरील लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.”
न्यायालयाच्या टीकेनंतर FSSAI चा पाठिंबा
FSSAI प्रमुखांनी दिलेला हा पाठिंबा तुकाराम मुंढे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएच्या या अति-कडक कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
“लहानसहान चुकांसाठी थेट व्यवसाय बंद करणे किंवा परवाने रद्द करणे म्हणजे डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करण्यासारखे आहे,” अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान केली होती. नियमांचे पालन करून व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारण्याऐवजी एफडीए घाईघाईने कठोर निर्णय घेत असल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला होता.
न्यायालयाच्या या टीकेच्या पार्श्वभूमीवर, आता देशाच्या सर्वोच्च अन्न सुरक्षा संस्थेनेच तुकाराम मुंढे यांच्या धोरणांचे आणि कठोर पावलांचे उघडपणे समर्थन केल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात या विषयावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
