पुणे – सातारा महामार्गावर गौरीशंकर महाविद्यालयासमोर बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मोटारीच्या झालेल्या अपघातात दोन जण ठार तर दोन जखमी झाले.
रमेश विष्णू चौधरी, सुरेश चंद्रकांत चौधरी, अशोक पांडुरंग चौधरी, हे मुंबई येथील व्यापारी असून ते घेरा केंजळ (ता वाई) येथे गावी आले होते.त्यांच्या मित्राच्या वडिलांचे निधन झाल्याने अंत्यसंस्कारासाठी गावातीलच रतन शंकर वाडकर याच्यासह रेणावळे पुनर्वसित लिंब ता. सातारा येथे जात असताना महामार्गावर लिंब गावच्या हददीत गौरीशंकर महाविदयालयासमोर आल्यावर रस्त्यावरील मोठया खडडयातून मोटार गेल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून मोटारीने तीन चार कोलांट उडया मारुन गाडी एका बाजूला जाऊन आदळली. त्यात रमेश विष्णू चौधरी (वय २८) रतन शंकर वाडकर (३८)या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर सुरेश आणि अशोक चौधरी गंभीर जखमी झाले असून त्यांना सातारा येथील खासगी दवाखान्यात दाखल केले आहे.