गडचिरोली-राजनांदगाव या आंतरराज्यीय महामार्गावरील सावरगावनजीक आज सकाळी नक्षलवाद्यांनी दोन युवकांची गळा चिरून हत्या केल्याचे उद्यडकीस आले. ब्रिजलाल उसेंडी व अनिल काल्को अशी मृतांची नावे असून दोघेही छत्तीसगडमधील केरगट्टाचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून त्यांची हत्या केल्याचा अंदाज आहे. सावरगाव महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर आहे. येथून अर्धा किलोमीटरवर या दोन युवकांचे मृतदेह आज सकाळी रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना आढळून आले. सुरुवातीला दोघांचा मृत्यू अपघातात झाला असावा, असे नागरिकांना वाटले, मात्र घटनास्थळी नक्षल पत्रके आढळून आली. त्यात आणखी सात जणांची नावे लिहिली असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून उत्तर व दक्षिण गडचिरोलीत नक्षल भरती बंद आहे. मात्र छत्तीसगडमधील बस्तरमधून अजूनही नक्षल भरती सुरूच आहे. तेथील नक्षली गडचिरोली जिल्ह्य़ात येत असून विध्वंसक कारवाया करत आहेत, अशीही चर्चा आहे.