मंत्रालयात दोन वॉररूम स्थापन करण्यावरून शिवसेना नेत्या आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्कूटर सरकार असून त्यांचं आपसातच युद्ध सुरू आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ जारी करत ही टीका केला आहे. मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांच्याही वेगवेगळ्या वॉररूम स्थापन करण्यात आल्या आहेत, यावरून या स्कूटर सरकारमध्ये कोणताही समन्वय नाही, असं दिसत आहे, अशी टीका मनीषा कायंदे यांनी केली आहे. हेही वाचा- “स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राला धोके” महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल संबंधित व्हिडीओत कायंदे म्हणाल्या की, आमचे विरोधक म्हणजे भारतीय जनता पार्टी सतत टीका करायची की, महाविकास आघाडी सरकार हे तीन पायांचं सरकार आहे, ते रिक्षा सरकार आहे. परंतु आता हे स्कूटर सरकार आलं आहे. या स्कूटर सरकारमध्ये मंत्रालयात दोन वॉररुम स्थापन केल्या आहेत. एक मुख्यमंत्र्यांची आणि दुसरी उपमुख्यमंत्र्यांची आहे, म्हणजे वरवर सर्व काही चांगलं चाललंय, 'एक दुजे के लिए' चाललंय, ते खरंच तसं आहे का? की उपमुख्यमंत्रीच छुपे मुख्यमंत्री आहेत? हा प्रश्न पडतो. त्यामुळे मंत्रालयात दोन वॉररूम कशासाठी? की त्यांचंच आपसातच युद्ध सुरू आहे, हा प्रश्नही याठिकाणी उपस्थित होतो, असंही कायंदे यावेळी म्हणाल्या.