३५०व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर राज्य सरकारकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दीपक केसरकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, भाजपा खासदार उदयनराजे भोसले आदी नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी सोहळा अर्ध्यात सोडून सुनील तटकरे तिथून निघून गेल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात सुनील तटकरेंनी केलेल्या आरोपांवर उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तरादाखल खोचक सवाल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं?

आज सकाळी शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडत असताना सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती. यावेळी विरोधी पक्षातील एकच नेते, जे रायगडचे खासदार आहेत, ते सुनील तटकरे उपस्थित होते. मात्र, शिवराज्याभिषेकाचे विधी आटोपल्यानंतर तटकरे तिथून निघून गेले. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

“मी एक शिवभक्त नागरिक म्हणून इथे आलो होतो. शिवराज्याभिषेक सोहळा पूर्ण होईपर्यंत मी शिवभक्त मावळा म्हणून उपस्थित होतो. पण नंतरचा कार्यक्रम जरा राजकीय होता. मी या विभागाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतो. एक शिवभक्त म्हणून माझ्या भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्याची राजशिष्टाचारानुसार असणारी माझी संधी का डावलली गेली? मला माहिती नाही”, असं तटकरे म्हणाले.

“माझी संधी का डावलली गेली?” रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा अर्ध्यात सोडून सुनील तटकरे माघारी; म्हणाले, “सरकारी कार्यक्रमात…!”

दरम्यान, तटकरेंच्या या आरोपांवर खासदार उदयनराजे भोसले यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “सुनील तटकरे आत्ता कुठल्या पक्षातले आहेत? हा कार्यक्रम शासकीय नसता, राजकीय असता तर त्यांना कार्यक्रमाला बोलवलं असतं का?” असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

विरोधकांवर टीकास्र!

दरम्यान, यावेळी कार्यक्रमासंदर्भात टीकात्मक भूमिका घेणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांवर उदयनराजे भोसले यांनी टीका केली आहे. “या लोकांचे कुणी हात पकडले होते का? कुणी थांबवलं होतं का? छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेता, पण असे कार्यक्रम तुम्ही घेत नाही. तुमचा नाकर्तेपणा किंवा आळशीपणा लपवण्यासाठी एखादा मनापासून असा कार्यक्रम नियोजित करत असेल, तर नाव ठेवण्याचं काय कारण? तुम्ही करा ना? तुम्हाला कुणी थांबवलं होतं का?” असं उदयनराजे भोसले म्हणाले.

सरकार पडणार असं विरोधक सातत्याने म्हणतायत, असं माध्यम प्रतिनिधींनी विचारलं असता त्यावर त्यांनी खोचक टीका केली. “तु्म्ही बघताय, चाललंय व्यवस्थित. काहीतरी बोललं पाहिजे ना. नाहीतर आज जे लोक त्यांच्याबरोबर आहेत, हळूहळू त्याला गळती लागेल. मग त्यांना थांबवण्यासाठी काहीतरी बोलणं गरजेचं आहे. मी त्यांच्या जागी असतो, तर मीही हेच केलं असतं”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udayanraje bhosale slams ncp sunil tatkare on shivrajyabhishek sohala comment pmw
First published on: 02-06-2023 at 14:09 IST