जे कोण चोरमंडळ म्हणाले असतील त्यांनी आरशासमोर तेच म्हणावे, म्हणजे त्यांना त्यांच्या प्रतिबिंबाचे उत्तर आपोआप मिळेल, असा खोचक टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला. शिवगर्जना मेळाव्याच्या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर खोचक शब्दात टीका केली. विधिमंडळ (संसदिय) पक्ष म्हणजे शिवसेना नव्हे, अशा शब्दात शिंदे गटावर निशाणा साधत खासदार राऊत यांनी राज्यात सध्या विधिमंडळ नसून चाळीस जणांचे चोरमंडळ आहे, असा टोला लगावला होता. हेही वाचा- “संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा….” भरत गोगावले यांचा टोला विधिमंडळातील पक्ष म्हणजेच शिवसेना असे काही जण म्हणत असतील ते खोटे आहे. ते तर बनावट शिवसैनिक आहेत. विधिमंडळात या बनावट शिवसेना आमदारांच्या रूपाने चाळीस चोरांचे मंडळ आहे. या लोकांनी आपण कितीही शिवसेना असल्याचा आव आणला तर राज्यातील जनता त्यांना स्वीकारणार नाही, त्यांनी आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. कारण अशी अनेक पद आम्हाला पक्षाने आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहेत. ती पदे आम्ही अशी ओवाळून टाकतो. पदे गेली तर परत येतील. पण आम्हाला आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, असे राऊत म्हणाले होते. हेही वाचा- “आपल्याकडे निष्ठेची तर, त्यांच्याकडे सौदेबाजीची मंडळी”; माजी आमदार सुभाष भोईर यांची मुख्यमंत्र्यांवर टीका याबाबत खासदार उदयनराजे भोसले साताऱ्यात माध्यमांशी बोलताना म्हणाले, जे कोण चोरमंडळ म्हणाले असतील त्यांनी आरशासमोर तेच म्हणावे. म्हणजे त्यांना त्यांच्या प्रतिबिंबाचे उत्तर आपोआप मिळेल, आरसा हा सगळ्यांना लागू होतो. या पृथ्वीवर कोणीही नाही की त्याला तो लागू होत नाही असेही खासदार उदयनराजे म्हणाले.