कराड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (कै.) विलासकाका उंडाळकर यांचे पुत्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व रयत साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर हे येत्या शनिवारी (दि. १९) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करीत असून, निमित्ताने कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उंडाळकर यांचा हा प्रवेश म्हणजे सातारा जिल्ह्यात अगोदरच अडचणीत आलेल्या काँग्रेस पक्षाला मोठा फटका असल्याचे समजले जाते.

थोर स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर यांचे उदयसिंह हे नातू, तर स्वातंत्र्यसैनिक श्यामराव पाटील उंडाळकर यांचे पुतणे आहेत. उदयसिंहांच्या पक्ष बदलाच्या भूमिकेचा काँग्रेसला मोठा झटका बसला असून, सातारा जिल्ह्यात कधी काळी सुवर्णकाळ अनुभवणाऱ्या काँग्रेसची स्थिती केविलवाणी झाली आहे.

काँग्रेसचा हात सोडल्याच्या निर्णयाबाबत बोलताना उदयसिंह म्हणाले, ‘राजकारणात अलीकडच्या काही वर्षांत बरीच स्थित्यंतरे झाली. त्या साऱ्या पार्श्वभूमीवर काही तरी ठोस निर्णय घ्यायला हवा, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या होत्या. राष्ट्रवादीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी दुपारी चार वाजता श्यामराव पाटील फळे, फुले, भाजीपाला मार्केटच्या मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्त्याचा मेळावा होत आहे.

कार्यक्रमाला मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब सोळस्कर, पृथ्वीराज गोडसे, सोनाली पोळ आदी उपस्थित राहणार असल्याचे उंडाळकर यांनी सांगितले.
अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर म्हणाले, ‘खरे तर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्याकडून राजकारणाचे धडे घेऊन ज्येष्ठ नेते दिवंगत विलासकाका पाटील- उंडाळकर यांनी समाजातील सामान्य जनतेचे नेतृत्व करत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम आयुष्याच्या अखेरपर्यंत केले. विधानसभेच्या कराड दक्षिण मतदारसंघाचे त्यांनी सलग ३५ वर्षे प्रतिनिधित्व केले. अनेक वर्षे विविध खात्यांचे मंत्री म्हणूनही यशस्वी धुरा वाहिली. त्यातून त्यांनी कराड दक्षिण मतदारसंघाला विकासाच्या उंचीवर नेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामान्य माणसाशी नाळ

विलासकाका उंडाळकरांना विधानसभेच्या सन २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षांतर्गतच संघर्ष करावा लागला. तरीही त्यांनी राजकारणातील तत्त्व जोपासत सामान्य माणसाची नाळ शेवटपर्यंत सोडली नाही. राज्याच्या राजकारणात सातत्याने बदल होत आहेत. कार्यकर्त्यांना राजकीय ताकद मिळण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विचारांशी जवळीक असलेल्या आणि सत्तेतील पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी सांगितले.