महाराष्ट्रामध्ये मागील दोन आठवड्यांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींसंदर्भात भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचं नेतृत्व करण्याची आणि मुख्यमंत्री पदाची जबाबदारी उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर का देण्यात आली याबद्दलचा खुलासा केलाय. माहाविकास आघाडी सरकारमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी बंडखोरी केल्यानंतर २९ जून रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याच साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच शरद पवारांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यामागील कारण सांगितलं.

नक्की वाचा >> २०० आमदार निवडून आणण्याच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, “मला वाटतं त्यांचं चुकलं काहीतरी, आपली…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील सत्तांतरनाट्य, देशातील विरोधकांची भूमिका, श्रीलंकेतील अराजक आणि न्यायप्रक्रियेबाबत कायदे अभ्यासकांकडून होत असलेली चिंता आदी मुद्द्यांवर शरद पवार यांनी रविवारी भाष्य केलं. याच चर्चेदरम्यान त्यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आपल्याला शरद पवारांनी घ्यायला लावली असं विधान उद्धव ठाकरेंनी केल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला. मुख्यमंत्रीपद शरद पवारांनी आपल्याला घ्यायला लावलं. ती जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल असं पवारांनी आपल्याला सांगितलं होतं, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यांचा संदर्भ देत पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. त्यावर पवार यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना कोणीही उद्धव यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवलेलं नव्हतं असं सांगताना चर्चेनंतर हे नाव निश्चित केल्याचं सांगितलं.

पाहा व्हिडीओ –

नक्की वाचा >> अजित पवारांचं बंड मोडण्यात तुम्हाला यश आलेलं मग उद्धव ठाकरे बंड का मोडू शकले नाहीत?; शरद पवार म्हणाले, “आमच्यात काही…”

“काही लोक राजकीय निर्णयांबद्दल असं म्हणतात की त्यांच्या पक्षाचा निर्णय वेगळा असतो. पक्षाचा निर्णय वेगळा असू शकेल. पण ते सरकार एका पक्षाचं नव्हतं,” असं पवार म्हणाले. पुढे बोलताना, “ते (महाविकास आघाडी) सरकार तीन पक्षांचं होतं. त्यामुळे तीन पक्षांना मान्य होईल अशी व्यक्ती असावी यासंदर्भात चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचं नाव आलं. कोणी काही सुचवलेलं नव्हतं. शेवटी हे सरकार चालावं अशी अपेक्षा होती,” असं पवार उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपद कसं आलं यासंदर्भात भाष्य करताना म्हणाले.

नक्की वाचा >> फडणवीसांच्या नागपूरमधील बॅनर्सवरुन अमित शाहांचे फोटो गायब; शरद पवारांना विचारलं असता म्हणाले, “त्याच्यात कोणाचा फोटो…”

उद्धव ठाकरेंनी सत्ता नाट्यादरम्यान जनतेशी संवाद साधताना शरद पवार यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना झालेल्या चर्चेचा संदर्भ दिलेला. त्यावेळी उद्धव यांनी शरद पवारांनी तुम्हाला नेतृत्व करावं लागेल असं सांगत मुख्यमंत्रीपदाची जाबबदारी स्वीकारण्याचा आग्रह केला होता, असं सांगितलेलं. तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधानसभेमध्ये बोलताना आपल्या नावाची या पदासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वेळेस चर्चा झालेली मात्र त्याला अजित पवारांनी विरोध केला होता, असा दावा केलेला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray becomes cm as all three parties agree on his name says sharad pawar scsg
First published on: 11-07-2022 at 14:22 IST