एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह केलेल्या बंडानंतर शिवसेनेची बाजू नेत्या दीपाली सय्यद यांनी आक्रमकपणे मांडली. पण, अलीकडे यु-टर्न घेत शिंदे गटात जाण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. त्यानुसार दीपाली सय्यद यांचा शिंदे गटात प्रवेश निश्चितही झाला. सय्यद यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला भाजपाच्या काही नेत्यांनी कडाडून विरोध केला. मात्र, आता सय्यद यांनी पुन्हा एकदा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच, आपल्या प्रवेशाला विरोध नसल्याची स्पष्टोक्तीही सय्यद यांनी दिली आहे. "यापूर्वीच माझा शिंदे गटात प्रवेश होणार होता. काही कारणास्तव तो झाला नसल्याने थांबले होते. शिंदे गटातील प्रवेशाला भाजपाचा विरोध नाही. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा प्रवेशाला विरोध नसल्याचं सांगितलं आहे. शिवसेनेत एकत्र काम करण्यासाठी पाठिंबा मिळत नव्हता. त्यामुळे शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तसेच, माझ्याबरोबर उद्धव ठाकरेंनीही शिंदे गटात प्रवेश करावा," असे आवाहन दीपाली सय्यद यांनी केलं आहे. हेही वाचा : “…तर माफी मागायच्या लायकीचासुद्धा ठेवणार नाही”, रोहित पवारांचा सुधांशू त्रिवेदींना इशारा सय्यद यांच्या प्रवेशाला भाजपाचा विरोध का? राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे आधी दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाची माफी मागावी. त्यानंतर दीपाली सय्यद यांना शिंदे गटात प्रवेश दिला जावा, अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या नेत्या मृणाल पेंडसे यांनी केली होती.