रत्नागिरी : शिवसेना ठाकरे गटातून लोक बाहेर पडत आहे, त्याचे उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शिवसेना ठाकरे गटात कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम केले गेले. मात्र बाळासाहेबांच्या या शिवसेनेत काम करणारा कार्यकर्ता राजा असणार आहे. आम्हाला शिव्या शाप देणाऱ्यांना कामातून उत्तर द्यायचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. रत्नागिरी येथे घेण्यात आलेल्या महायुतीच्या आभार सभे प्रसंगी ते बोलत होते.

कोकणचा विकास करण्यासाठी कोकण विकास प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. कोयनेतून वाहून जाणारे ६७ टीएमसी पाणी थांबवण्याचे काम सरकारकडून करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, महायुतीचा विजय हा बाळासाहेबांच्या चरणी अर्पण आहे. कोकणाने बाळासाहेबांवर आणि धनुष्यबाणावर प्रेम केले आहे. शिवसेना वाढीमध्ये कोकणाचा सिंहाचा वाटा आहे. नुकत्याच झालेल्या निवडणूकमध्ये महाविकास आघाडीपेक्षा आपला स्ट्राइक रेट जास्त आहे. शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही, असे भाकीत करणाऱ्यांची तोंडे बंद झाली आहेत. ८० पैकी ६० जागा शिवसेनेने निवडून आणले आहेत. महायुतीचे २३२ आमदार निवडून आले आहेत. महायुतीला पंधरा लाख मते जास्तीची मिळाली आहे. लाडक्या बहिणीनी महायुतीला मत दिल्याने शिवसेनेने अभूतपूर्व यश मिळवले असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

ते म्हणाले, महाविकास आघाडीने बंद पडले सर्व उद्योग प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र विकासाला चालना देण्यात आली आहे. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र एक नंबर ला आणून ठेवला आहे. पदे येतात आणि जातात, सत्ता येथे जाते मात्र एकदा नाव गेले की परत येत नाही असे शिंदे यांनी सांगितले. दावोसला जाऊन जाऊन १६ लाख कोटीचा उद्योग करार करण्यात आला आहे. यामुळे रोजगार उत्पन्न होणार आहे. कोण रामदास कदम?कोण एकनाथ शिंदे? असे म्हणणाऱ्यांना आम्ही कोण आहोत हे दाखवून दिले आहे. आमच्या नादी लागू नका असा इशाराही शिंदे यांनी दिला. जोपर्यंत आमच्या मागे लाडक्या बहिणी, भाऊ आणि लाडके शेतकरी आहेत, तोपर्यंत आम्हाला कोणाचीही भीती नसल्याचे यांनी सांगितले.

यावेळी दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी कोकणात आणखी शिवसेना वाढवणार असे आश्वासन शिंदे यांना दिले. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचाराला कालिमा फासण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री पद घेऊन बाळासाहेबांनी कमावलेल सगळं गमावलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले नसते तर शिवसेना फूटली नसती असे रामदास कदम यांनी सांगितले. ते म्हणाले, शिवसेना वाढवण्यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांचे कोणतेच कर्तुत्व नाही. यांना हे सर्व आयते मिळाले असल्याचे टीका कदम यांनी यावेळी केली.

यावेळी व्यासपिठावर आमदार योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार निलेश राणे , उद्योगमंत्री उदय सामंत, माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार रामदास कदम, माजी आमदार सुभाष बने, रवींद्र फाटक, राजु महाडिक, बंड्या साळवी, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजेंद्र महाडिक यांनी आपल्या पत्नीसह शिंदे गटात प्रवेश केला. तसेच माजी जीप अध्यक्ष रोहन बने, पराग बने, ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष विलास चाळके, बाळा जाधव, अशोक सावंत यांच्यासह आठ विद्यमान सरपंच, उसरपंच, सदस्य यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.

शिवसेना ठाकरे गटातून हाकालपट्टी करण्यात आलेले जिल्हाप्रमुख विलास चाळके, रोहन बने, राजेंद्र महाडिक यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला.

शिवसेनेच्या या आभार सभेसाठी महिला व विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यात आले. रत्नागिरीतील ३०० पेक्षा जास्त एसटी फे-या रद्द करुन लाडक्या बहिणींना आणण्यासाठी गावो गावी पाठविण्यात आल्याने प्रवाशांची व विद्यार्थीवर्गाची चांगली धावपळ झाली.