मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यानिमित्तच्या भाषणावर आता टीकासत्र सुरू झालं आहे. आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता किरीट सोमय्या यांनीही या भाषणातल्या काही मुद्द्यांवर टीका केली आहे. कालच्या भाषणात बोलताना ठाकरे यांनी सोमय्या यांच्या अप्रत्यक्षपणे टीका करत असं वक्तव्य केलं की कोणाच्याही बायका-मुलांवर आरोप करणं हा अक्करमाशीपणा आहे. यावरच आता सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी टीव्ही९ शी बोलताना सोमय्या म्हणाले, “मी ठाकरेंच्या विधानाशी एकदम सहमत आहे. कोणीही खोटे आरोप केलेले योग्य नाही. पण जर उद्धव ठाकरे आपल्या बायकोच्या रश्मी उद्धव ठाकरेंच्या नावाने घोटाळा करत असेल तर साडेबारा कोटी जनता जाब विचारणार. मुख्यमंत्री लुटमार करतात. उपमुख्यमंत्री तर..अरे बापरे! अजित पवारांनी विधान केलं होतं, माझ्या बहिणीच्या घरी का इनकम टॅक्सवाले गेले? किरीट सोमय्यांनी सगळी कागदपत्रं ठेवली ना? तर बायकोच्या नावाने, बहिणीच्या नावाने बेनामी व्यवहार करणं हे त्याहीपेक्षा मोठं पाप आहे. मग तो मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो!
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा मुलगा त्या बिल्डरसोबत संचालक होता, किरीट सोमय्याने कागदपत्रं ठेवली ना? मग का पार्टनरशीप मागे घेतली? म्हणून महापालिकेच्या माफिया कॉन्ट्रॅकरकडून पार्टनरशीपचा मिळालेला पैसा बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणार असाल तर त्याचा जाब मुख्यमंत्र्यांना द्यावा लागणार”.

सोमय्या यांनी पवार कुटुंबावरही टीका केली आहे. ते म्हणाले, “अजित पवार, सुनेत्रा पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, रोहित पवार आणि आता त्यांना ठाकरे सरकारमध्ये एक नवीन माफिया साथीदार सापडला आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे. आता हे पहिला हल्ला सुरू करणार सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स सगळ्यांना टार्गेट करणार, आमच्या बायका-मुलांवर कारवाई होतेय, मोदी घडवून आणतायत हे सगळं बोलणार. त्यावेळी समाजातले कार्यकर्ते जे ह्यांचेच पीआर यंत्रणा आहेत तेही आपलं काम सुरू करणार. पण राज्याच्या आणि केंद्रीय तपास यंत्रणांमध्येही काही चांगले अधिकारी आहेत. आणि न्यायालयही साडेबारा कोटी जनतेच्या बाजूने उभे राहणार”.