शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी भाजपा तसेच ईडीविरोधात आंदोलन केले आहे. असे असताना उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या विचारधारेवर टीका केली आहे. तसेच विरोधकांच्या एकजुटीवर बोलताना तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर (के. चंद्रशेखर राव) आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी माझ्या संपर्कात आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >>> “शिवसेना संपत आलेला पक्ष”, भाजपा अध्यक्ष नड्डांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“प्रादेशिक पक्षांची एकजूट हा पुढचा टप्पा झाला. पण प्रादेशिक पक्ष संपवण्याचे भाजपाचे राजकारण आहे. या राजकारणाची सुरुवात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उद्गारातून झालेली आहे. प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकायची. हिंदूंमध्ये फूट पाडायची. मराठी माणसाला चिरडून टाकायचे, असे भाजपाचे कारस्थान आहे,” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

हेही वाचा >>> Sanjay Raut ED Arrest: संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

“राष्ट्रपतींची किंवा अन्य निवडणुकीवरून एक्य होणार की नाही हे अवलंबून नसते. अजूनही वेळ आलेली नाही. पण वेळ जाण्याच्या अगोदर देशातील सर्व जनतेने विचार करण्याची वेळ आली आहे,” असेदेखील उद्धव ठाकरे म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> “संजय राऊतांचा मला अभिमान, काळ तुमच्यासोबतही…” ईडीच्या कारवाईनंतर उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

“ममता बॅनर्जी तसेच केसीआरे हे नेते माझ्या संपर्कात आहेत. पण काल यांचा (भाजपाचा) मुखवटा बाजूला झाला आहे. जेपी नड्डा यांच्या पोटातलं ओठावर आले आहे. त्यांना या देशात दुसरे कोणतेही पक्ष नको आहेत. म्हणजेच त्यांना हुकुमशाही हवी आहे,” असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.