राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आग्रह केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मात्र, उद्धव ठाकरेंचा हा दावा आता माजी मंत्री सुरेश नवले खोडून काढला आहे. उद्धव ठाकरेंना १९९६ सालीच मुख्यमंत्री व्हायचं होते, असा गौप्यस्फोट नवले यांनी केला आहे. सुरेश नवले 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलत होते. "१९९६ साली युती सरकारमध्येच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी बाळासाहेब ठाकरेंना भेटून तसा प्रस्ताव द्यावा, असे उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. त्यानुसार आम्ही बाळासाहेब ठाकरेंकडे गेले होतो. तेव्हा बाळासाहेबांनी विचारलं होते, तुम्ही कोण्याच्या सांगण्यावरून आला आहात का? मात्र, महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरेंची ती इच्छा पूर्ण झाली," असेही सुरेश नवले यांनी स्पष्ट केलं. हेही वाचा - “एकनाथ शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका,” काँग्रेस आमदाराचा खळबळजनक दावा कोण आहेत सुरेश नवले? १९९० आणि १९९५ मध्ये बीड विधानसभेसाठी शिवसेनेकडून राज्यातील सर्वात पहिला उमेदवार म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरेश नवले यांचे नाव जाहीर केले होते. सुरेश नवले हे ठाकरे कुटुंबाच्या जवळ मानले जात होते. नवले हे त्यावेळी नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात. युती सरकारच्या कार्यकाळात ते शिवसेनेकडून मंत्रीही होते. दरम्यान, काही दिवासांपूर्वी सुरेश नवले यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.