कोल्हापूर :वस्त्रोद्योगाच्या जागतिक बाजारपेठेतील समीकरणे बदलत असली, तरी त्यामध्ये संधी मिळवण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. चीन, बांगलादेश यांसारख्या स्पर्धक देशाच्या रणनीतीला शह देऊन निर्यात बाजारपेठेत भारत आपला प्रभाव दाखवून देईल, असे मत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी व्यक्त केले.


दोन दिवसीय कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह आले होते. या वेळी त्यांच्याशी ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधींनी संवाद साधला. या वेळी मंत्री सिंह यांनी भारतीय वस्त्रोद्योग निर्यात बाजारपेठ, कापूस गुणवत्तासुधार कार्यक्रमातून शेतकरी – विणकारांचे होणारे कल्याण, सरकारी धोरण आदीबाबत आपली भूमिका मांडली.

अमेरिकेने आयात कर धोरणात मोठ्या प्रमाणात बदल केल्याने त्याचा भारतीय वस्त्र उद्योगावर होणाऱ्या परिणामाची चर्चा करताना मंत्री सिंह म्हणाले, प्रत्येक देशाला आपले करविषयक, तसेच व्यवसाय वाढवण्याचे धोरण राबवण्याचा अधिकार आहे. अमेरिकेने आयात करामध्ये मोठा बदल केला आहे. तो तूर्त तीन महिन्यांसाठी स्थगित ठेवला असल्याने आपल्याला पूर्वीच्या कर रचनेप्रमाणे निर्यात करण्याची संधी मिळालेली आहे. दुसरीकडे, भारताचे वस्त्रोद्योग निर्यातीतील मुख्य स्पर्धक चीन, बांगलादेश हे देश आहेत. अमेरिका, युरोपीय, तसेच अन्य देशांमध्ये भारतीय वस्त्रोद्योग निर्यात वाढवावी यासाठी प्रभावी, आक्रमक धोरणे आखली असून, त्यानुसार वाटचाल सुरू आहे. भारतीय वस्त्रोद्योजक वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र उत्पादने बनवत असल्याने आपल्याकडे कौशल्य – गुणवत्तेची कमतरता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय वस्त्रोद्योग जगाचा बाजारपेठेत उतरून आपला प्रभाव नजीकच्या काळात निश्चितपणे दाखवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतात गेल्या दोन हंगामांत कापूस मोठ्या प्रमाणात आयात करावा लागला. याकडे लक्ष वेधले असता मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, की जगाच्या तुलनेत भारताचे एकरी कापूस उत्पादनाचे प्रमाण कमी आहे. ते अधिक प्रमाणात वाढावे यासाठी केंद्र सरकारने कापूस अभियान सुरू केले आहे. महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात सुमारे सात हजार हेक्टरपर्यंत हे अभियान राबवले जात आहे. एकाच प्रकारची पेरणी, खते, कीटकनाशके, उगवण पद्धत यावर या अभियानात भर देण्यात आला आहे. कस्तुरी हा गुणवत्तापूर्ण कापूस अधिक वाढण्यासाठी नियोजन केले केले आहे. शिवाय शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही यामध्ये सामावून घेतलेले आहे. त्याचे फायदे दिसून येतील. याचबरोबर कृत्रिम धागा उद्योग वाढावा यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी कंपन्या तयार झाल्या आहेत. खेरीज, बांबूसारख्या अन्य प्रकारच्या नैसर्गिक धाग्यांचा वापर केलेली वस्त्रप्रावरणे वाढीस लागावी याकडे लक्ष पुरवलेले आहे.

भारतीय वस्त्रोद्योगातील यंत्रसामग्रीही भारतात निर्मित व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत,असा उल्लेख करून मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, की भाजपचे सरकार केंद्रात येण्याआधी काँग्रेसच्या कार्यकाळात दहा वर्षांमध्ये ३३ लाख शिलाई मशिन आयात करण्यात आल्या होत्या. मोदींच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात दीड कोटी शिलाई मशिन आयात झाल्या आहेत.आता अशा प्रकारची यंत्रसामग्री भारतातच उत्पादित व्हावी यावर भर दिला जात आहे. शिलाई मशिन बनवणारा प्रकल्प उत्तर प्रदेशमध्ये उभा केला जात आहे. गुजरातमध्येही अशी यंत्रसामग्री बनवणारे कारखाने उभे केले जाणार आहेत,असेही त्यांनी या वेळी सांगितले.
कुरकुटे, शहा आणि ललवाणी

मुलाखतीवेळी मंत्री गिरीराज सिंह यांनी इचलकरंजीतील काही वेगळ्या प्रयोगशीलतेचा आवर्जून संदर्भ दिला.संजय कुरकुटे या उद्योजकाने जागतिक दर्जाचे रेपीयर लुम (अत्याधुनिक माग) निर्माण केला आहे. रोहित शहा निर्मित कपडे तरुणांमध्ये लोकप्रिय बनत आहेत.अरुण ललवाणी यांची धोती प्रसिद्ध आहे,असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.