मंगळवारी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात धुळवड साजरी करण्यात आली. पण महाराष्ट्रातील यवतमाळ येथे अनोख्या पद्धतीने धुलिवंदन साजरा करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील गदाजी(बोरी) येथे धुलिवंदनाच्या दिवशी गोटमारीचा अर्थात एकमेकांना दगड मारून हा सण साजरा केला जातो. दगड मारामारीची ही परंपरा केवळ पंचक्रोशीत नव्हे तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. या खेळात सर्वात शेवटी बाद होणार्या व्यक्तीची जिवंत प्रेतयात्रा वाजत-गाजत काढली जाते.संत गदाजी महाराजांचे वास्तव्य आणि त्यांनी सुरू केलेल्या दगड मारायच्या खेळाने बोरी गाव गदाजी (बोरी) नावाने ओळखले जाते. धुलीवंदनाच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. विदर्भातून श्रद्धाळू लोक मोठ्या संख्येने दगड मारण्याचा खेळ पाहण्यासाठी येतात. धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी या खेळाला सुरुवात होते. या खेळात सर्वात शेवटी बाद होणार्या व्यक्तीची जिवंत प्रेतयात्रा काढली जाते. त्याला गावकरी मढं असे संबोधतात. २१ फूट उंचावर चार ते पाच होळकर (दगड मारणारा खेळाडू) राहतात. दहा ते बारा होळकर खालून वर दगड मारतात. तिन्ही बाजूने एकमेकावर गोट्याचा जोरदार हल्ला केला जातो. जोपर्यंत एखादं होळकर रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध होत नाही, तोपर्यंत हा खेळ सुरू राहतो.