अहिल्यानगरः पारनेर तालुक्यातील तिखोल, वनकुटे परिसराला आज, सोमवारी गारपीट व वादळी पावसाने झोडपले तसेच राहात्यातील कोल्हार-तिसगाव भागातही तुरळक गारपीट झाली. पारनेरमधील गारपीट सुमारे अर्धा-पाऊण तास सुरू होती. त्यामध्ये टोमॅटो, वटाणा, कोबी, कलिंगड पिकांचे मोठे नुकसान झाले. हवामान विभागाने काल, रविवारी, आज, सोमवारी व उद्या, मंगळवारी पावसाचा अंदाज वर्तवत जिल्ह्याला यलो ॲलर्ट जारी केला होता. अवकाळी पावसाने शेतात काढून ठेवलेला किंवा चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. टाकळी ढोकेश्वर, सुपा परिसरातही विजेच्या कडकडासह अवकाळीने हजेरी लावली पावसाने ऐन उन्हाळ्यातील काहीलीत काहीसा गारवा निर्माण केला.

गारपिटीसह अवकाळी पावसामुळे अनेक शेतात सखल भागात व बांधामध्ये पाणी साचले होते. एकीकडे दुष्काळी परिस्थितीशी सामना करत पिकवलेला टाॅमेटो, वाटाणा, कोबीसह चारा पिकांचे व फळबागांचे अवकाळीमुळे नुकसान झाले आहे.तिखोल येथील नुकसानग्रस्त शेतकरी सुभाष ठाणगे यांनी सांगितले की, आज दुपारी चारच्या सुमारास अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १ हेक्टरमध्ये लागवड केलेल्या टोमॅटो पिकाचे नुकसान झाले. कोबी लागवडही केली होती, हे उभे पीक पाण्यात गेल्याने नुकसान झाले. उभ्या पिकांत पाणी साचल्याने व गारांचा तडाखा बसल्याने हवालदिल झालो आहोत.

राहाता तालुक्यातील कोल्हार- तिसगाव परिसरातील गावातही किरकोळ स्वरूपाची गारपीट झाली. त्यामुळेही नुकसान झालेच आहे. अहिल्यानगर शहर परिसरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आज दिवसभर अनेक भागात ढगाळ वातावरण होते. प्रचंड उकाडाही जाणवत होता. ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरण तयार होवून दुपारी ३ ते ४.३० च्या सुमारास पावसाने हजेरी लावली.