हर्षद कशाळकर, लोकसत्ता अलिबाग- अलिबाग तालुक्यातील शहापूर ग्रामस्थांना सध्या भिषण पाणी समस्येला तोंड द्यवे लागत आहे. आठ दिवस गावाला पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांनी हंडाभर पाण्यासाठी वणवण सुरु आहे. अर्ज विनंत्या करून जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग दाद देत नसल्याने येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. पाणी द्य नाहीतर मानवी हक्क आयोगाकडे जाऊ असा इशारा ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे. गेली अनेक दिवस शहापूर ग्रामस्थांना अनियमीत पाणी पुरवठा केला जात आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामिण पाणी पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. पण ग्रामिण पाणी पुरवठा विभागाने त्यांची दखल घेतलेली नाही. अखेर संतप्त ११ ते १ या वेळेत गावातील सर्व सार्वजनिक आणि खाजगी नळांचा पंचनामा केला. एकाही नळाला थेंबभरही पाणी पुरवठा झाला नाही. सतत चार दिवस गावात पाणी आलेले नाही. त्यामुळे गावात पाणीबाणी निर्माण झाली आहे. गावाला ढोलपाडा ते शहापूर पाईप लाईन मधून पाणी पुरवठा केला जातो. या पाईप लाईनची तपासणी करावी आणि गावात पाणी न येण्यामागील कारणांचा शोध घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी पाणी पुरवठा विभागाकडे केली आहे. आठ दिवसात पाणी प्रश्न सुटला नाही तर मानवी हक्क आयोगाकडे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागा विरोधात तक्रार नोंदविणार असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. गावात आठ आठ दिवस पाणी पुरवठा केला जात नाही. त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. पाण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. पाणी पुरवठा विभागाने आठ दिवसात हा प्रश्न सोडवावा अन्यथा मानवी हक्क आयोगाकडे आम्ही तक्रार नोंदविणार आहोत. राजन भगत, ग्रामस्था मोठे शहापूर.