अलिबाग : माणगाव तालुक्यातील पन्हळघर धरणाचे पाणी परीसरातील गावांना पुरवले जाते. मात्र या धरणाला लागून असलेल्या वस्तीतील नागरीक मात्र हंडाभर पाण्यासाठी हालअपेष्टा सहन करीत आहेत. कोरडया नदीत खडडा खणून पाणी मिळवण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. यामुळे पाण्याबरोबरच रोजगाराचीही मोठी समस्या इथं निर्माण झाली आहे . माणगावच्या लोणेरे पासून जवळ असलेल्या 80 उंबरयांच्या या आदिवासीवाडीवर 250 लोकवस्ती आहे. पावसाळा संपला की येथील नागरीकांची पाण्यासाठी वणवण सुरू होते.
हंडाभर पाण्यासाठी महिलांना संपूर्ण दिवस खर्ची घालावा लागतो. यातून गावातील वयोवृद्धांचीही सुटका झालेली नाही. गावापासून दूर कोरडया पडलेल्या नदीमध्ये ग्रामस्थ खडडा खणतात त्याला स्थानिक भाषेत डवरा म्हणतात. या डवरयात पाणी साचले की छोटया भांडयातून हंडयात भरले जाते. खड्डयातून मिळणारे पाणीदेखील दुषित असते त्यामुळं पोरंबाळं आजारी पडतात. त्यांची दुखणी काढायला पैसे आणायचे कुठून असा सवाल या आदिवासींनी उपस्थित केला आहे.गावापासून हाकेच्या अंतरावर पाटबंधारे विभागाचं धरण आहे. परंतु आजवर या धरणाचं पाणी कधी इथल्या आदिवासींच्या मुखाला लागलं नाही. गावाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आहे. तिथं पुरेसं पाणी आहे. आजूबाजच्या गावांना नळपाणी योजनेतून पाणीपुरवठा होतोय. पण ही आदिवासी वाडी आजही तहानलेलीच आहे.
घोटभर पाण्यासाठी झुंजणारे हे आदिवासी बांधव मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या पाच किलोमीटरवर राहतात. इथल्या आदिवासी भगिनींना लेकराबाळांना सोबत घेवून पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. खडडयातील साठवलेलं पाणी मिळवण्यासाठी झुंबड उडते त्यासाठी तासनतास ताठकळत बसावं लागतं. कामधंदे सोडून पाण्याच्या मागे फिरावं लागत आहे. त्यामुळे रोजीरोटीची गंभीर समस्या इथं निर्माण झाली आहे. पाणी भरण्यातच संपूर्ण दिवस निघून जातो मग नोकरी धंद्यासाठी कुठेही जाता येत नाही, रोजगार बुडतो. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था इथल्या ग्रामस्थांची झाली आहे . आम्हाला कुणी वाली आहे की नाही असा सवाल इथले ग्रामस्थ विचारताहेत .धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था खरबाची वाडीतील ग्रामस्थांची झाली आहे . आम्हाला कुणी वाली आहे की नाही असा सवाल इथले ग्रामस्थ विचारताहेत. सरकार आदिवासींच्या विकासासाठी अनेक योजना राबवतं. परंतु इथल्या आदिवासींची ही वणवण पाहिल्यावर या योजनांचं काय होतं असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही. डोंगरदरीत राहणारया या लाडक्या बहीणींचा रोजच्या जगण्यासाठीचा संघर्ष केव्हां थांबणार हा खरा प्रश्न आहे.
हंडाभर पाण्यासाठी आम्हाला दिवस खर्ची घालावा लागतो .त्यात भरलेला हंडा घरी आणेपर्यंत जीव कासावीस होतो. धरणाचे पाणी समोर दिसते पण ते आम्हाला मिळत नाही हे पाहून डोळयात आसवं येतात. पाऊस पडेपर्यंत आम्हाला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. शासकीय यंत्रणेने आमची ही समस्या गांभीर्याने घ्यावी .
देवकी झोरे , ग्रामस्थ महिला .
मुंबईच्या वेशीवर असलेल्या रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मागील ८ दिवसांमध्ये जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे-वाड्यांमध्ये ५४ ने वाढ झाली आहे. १२८ गावे व वाड्यांमधील जवळपास ५० हजार नागरिकांना २५ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र हा पाणी पुरवठा पुरेसा नसल्याने या गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र दिसून येत असून, दोन-ते तीन किलोमीटरची पायपीट करुन त्यांना पाणी आणावे लागत आहे. अलिबाग आणि पेण तालुक्यातील खारेपाट विभागात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.
लग्नसराईला पाणी टंचाईची झळ…
रायगड जिल्ह्यात गावातील लग्नसराईवरदेखील पाणीटंचाईचा मोठा परिणाम जाणवत आहे. काही वर्षांपासून गावामध्ये होणारे विवाह सोहळ्याचे प्रमाणही कमी झाले आहेत. पाणीटंचाईमुळे शहरातील सभागृहामध्ये विवाह लावण्याकडे आता ग्रामीण भागातील लोकांचा कल वाढू लागला आहे.