पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १९ सप्टेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली.

हेही वाचा- शिंदे गट दादरमध्ये उभारणार प्रति सेनाभवन; मुंबईतील प्रत्येक प्रभागात असणार कार्यालय

राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ५१ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्‌भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय

घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार १८ ऑगस्ट २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे २४ ऑगस्ट २०२२ ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे २७, २८ व ३१ ऑगस्ट २०२२ रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २ सप्टेंबर २०२२ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतदान १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी १९ सप्टेंबर २०२२ रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.

हेही वाचा- चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड; आशिष शेलारांकडे मुंबईची जबाबदारी


विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या: नंदुरबार: शहादा- ७४ व नंदुरबार- ७५. धुळे: शिरपूर- ३३. जळगाव: चोपडा- ११ व यावल- ०२. बुलढाणा: जळगाव (जामोद)- ०१, संग्रामपूर- ०१, नांदुरा- ०१, चिखली- ०३ व लोणार- ०२. अकोला: अकोट- ०७ व बाळापूर- ०१. वाशीम: कारंजा- ०४. अमरावती: धारणी- ०१, तिवसा- ०४, अमरावती- ०१ व चांदुर रेल्वे- ०१. यवतमाळ: बाभुळगाव- ०२, कळंब- ०२, यवतमाळ- ०३, महागाव- ०१, आर्णी- ०४, घाटंजी- ०६, केळापूर- २५, राळेगाव- ११, मोरगाव- ११ व झरी जामणी- ०८. नांदेड: माहूर- २४, किनवट- ४७, अर्धापूर- ०१, मुदखेड- ०३, नायगाव (खैरगाव)- ०४, लोहा- ०५, कंधार- ०४, मुखेड- ०५, व देगलूर- ०१. हिंगोली: (औंढा नागनाथ)- ०६. परभणी: जिंतूर- ०१ व पालम- ०४. नाशिक: कळवण- २२, दिंडोरी- ५० व नाशिक- १७. पुणे: जुन्नर- ३८, आंबेगाव- १८, खेड- ०५ व भोर- ०२. अहमदनगर: अकोले- ४५. लातूर: अहमदपूर- ०१. सातारा: वाई- ०१ व सातारा- ०८. व कोल्हापूर: कागल- ०१. एकूण: ६०८