|| नितीन बोंबाडे

मार्चमध्येच पाण्याचे दुर्भिक्ष्य

डहाणू : विव्वळवेढे ग्रामपंचायतच्या हद्दीतील महालक्ष्मी गडाच्या पायथ्याखालच्या बावळपाडा येथील रहिवाशांना पाण्यासाठी शेतात खड्डे खणून तहान भागवावी लागत आहे. उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र, महालक्ष्मी ग्रामपंचायतीची नळपाणी योजना सुरू आहे. मात्र महालक्ष्मी गडाजवळ पलाटावर स्थलांतरित झालेल्या रहिवाशांनी शेतामध्ये खड्डे खणले असल्याची माहिती महालक्ष्मी गावाचे सरपंच पूजा सातवी यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

धरणांचा तालुका म्हणून डहाणू तालुका ओळखला जातो. धामणी, कवडास धरणातून मीरा रोड, वसई-विरार महापालिकेला पाणी वाहून नेण्यासाठी एमएमआरडीएचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर साखरा धरणातून       बोईसर एमआयडीसी, बीएआरसी प्रकल्पाला पाणी पुरवले जाते. डहाणू तालुक्यातील धरणातून अनेक तालुक्यांतील नागरिकांची तहान भागवली जात आहे. मात्र, दुसरीकडे डहाणू तालुक्यातील पाडे पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेले आहेत.

डहाणू किनारपट्टीच्या गावांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य दिसत आहे. मार्च महिन्याच्या  सुरुवातीपासूनच डहाणू तालुक्यात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाण्यासाठी नागरिकांना शेतात खड्डे खोदून डबक्यावर तहान भागवावी लागते. एप्रिल, मे महिन्यात पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

महालक्ष्मी हे प्रसिद्ध देवस्थान असून येथे हजारो भाविक दर्शनाला येत असतात. तर चैत्र पौर्णिमेला दरवर्षी १५ दिवसांची मोठी यात्रा भरत असते. जलस्वराज सुविधा, नळपाणी योजना, बोअरवेल, विहिरींच्या माध्यमातून पाण्याची समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतकडून पिण्याच्या पाण्यासाठी  सोय केली जाते. मात्र तरीही काही भागांत पाण्याची समस्या जाणवत असल्याने या भागात नळपाणी योजनेचे पाणी पोहोचवण्याची मागणी नागरिकांची आहे .

महालक्ष्मी विव्वळवेढे येथे नळपाणी योजना सुरू आहे. महालक्ष्मी गडाच्या पायथ्याशी बावसपाडा येथील काही कुटुंबे पलाटावर घरे बांधून राहत आहेत. पण त्यांनी शेतात खड्डे खणले आहेत. त्यांना बोअरवेल आणि विहिरीची व्यवस्था आहे. – पूजा सातवी, सरपंच, महालक्ष्मी ग्रामपंचायत