अकोला : जिल्ह्यातील वनविभाग व वन्यजीव विभाग मिळून असलेल्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांना सध्याच्या कडक उन्हाळय़ात तहान भागवण्यासाठी सुमारे ६० कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले असून मनरेगा योजनेतून ३० वनतलाव तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक अर्जुना के.आर. यांनी दिली. याशिवाय वनविभागात नैसर्गिक जलस्रोतही आहेत, त्यातील पाणीही वन्यजीव हे उपलब्धतेनुसार आपली तहान भागवण्यासाठी वापरत असतात. अकोला प्रादेशिक वनविभागात चार वनपरिक्षेत्र असून त्यात अकोला, पातूर, बार्शी टाकळी, आलेगाव या वनपरिक्षेत्रांचा समावेश आहे. त्यात ६४ नियतक्षेत्र आहेत. यात दोन सहायक वनसंरक्षक, २० वनपाल, ८० वनरक्षक कार्यरत आहेत. अकोला वन्यजीव विभागात काटेपूर्णा अभयारण्याचा अकोला जिल्ह्यात असणारा कासमार व फेट्रा या दोन वन परिमंडळांचा समावेश होतो. याशिवाय नरनाळा हा मेळघाटाचा भागही अकोला जिल्ह्याच्या हद्दीत येतो. एकंदर अकोला जिल्ह्यात ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर वने आहेत. ही वने उष्णकटीबंधीय शुष्क पानझडी वने म्हणून ओळखली जातात. सध्या उन्हाच्या तीव्र झळा समस्त निसर्गाला होरपळून काढत आहेत. अशा या स्थितीत वनक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ३५ वनतळे असून ५० कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. तर अकोला वन्यजीव हद्दीत येणाऱ्या कासमार व फेट्रा मिळून १० कृत्रिम पाणवठे असे ६० कृत्रिम पाणवठे आहेत. या पाणवठय़ांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करून वन्यप्राण्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. याशिवाय सिमेंट नालाबांध, वनतलाव, मातीबांध, नैसर्गिक पाणवठे असे नैसर्गिक स्रोत आहेत. त्यात २० सिमेंट नालाबांध, ३५ वनतळे तसेच वनांमधून जाणाऱ्या नद्या, धरणे आदी नैसर्गिक जलस्रोत असतात. तथापि, उन्हाळय़ात यातील बहुतांश स्रोत आटतात आणि मग वन्यप्राण्यांना पाण्याच्या शोधार्थ भटकंती करावी लागते. त्यासाठी ते मानवी वस्त्यांमध्ये येतात, त्यातून वन्यजीव मानव संघर्ष उद्भवण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी वनांमध्ये कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. त्यात पाणी साठवून ते वन्यप्राण्यांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते. आगामी काळात टंचाई भासू नये यासाठी मनरेगाच्या माध्यमातून ३० नवे वनतलाव तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याशिवाय नैसर्गिक स्रोत जे उन्हाळय़ात आटले आहेत. त्यांची डागडूजी करण्याची कामेही हाती घेण्यात आली आहेत. त्यात गाळ काढणे, खोलीकरण करणे आदी कामे केली जातात. पाण्याची उपलब्धता नजिक असावी यासाठी भूजल पातळीचा अंदाज घेऊन बोअिरग करून पाणी उपलब्ध केले जाते. पाणी उपसण्यासाठी सोलर पंपाचाही वापर केला जातो. टँकरद्वारेही कृत्रिम पाणवठय़ात पाणी टाकले जाते. एका कृत्रिम पाणवठय़ात साधारण चार हजार लिटर पाणी साठवता येते. ९० हेक्टर क्षेत्रावर कुरण विकास प्राण्यांची अन्नासाठी भटकंती होऊ नये, म्हणून ९० हेक्टर क्षेत्रावर कुरण विकासाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यात मिश्र रोपांची व गवताची लागवड केली जाते. वनालगत असणाऱ्या गावातील पाळीव पशू चरण्यासाठी जंगलात येतात हे टाळण्यासाठी गवत कापून नेण्याची सुविधा दिली जाणार आहे, असेही अर्जुना यांनी सांगितले. पाळीव प्राणी जंगलात येणे टाळता येईल. तसेच जंगलातच पुरेसे खाद्य असल्यास वन्यप्राणीही शेतीत जाणार नाहीत.