राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह मित्रपक्षांनी महाविकास आघाडी निर्माण करत २०१९ मध्ये सत्ता स्थापन केली होती. परंतु ७ महिन्यांपूर्वी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षातील ४० आमदार फुटले आणि त्यांनी आमदारांचा नवा गट स्थापन केला. परिणामी राज्यातलं आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदेंच्या नव्या गटाने भाजपसोबत नवं सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हा शिवसेनेचा सत्तेतला मित्रपक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडूदेखील शिंदेंसोबत उभे राहिले. या सर्व आमदारांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आणि आमदार आदित्य ठाकरे सातत्याने टीका करत आहेत. बंडखोर आमदारांना ‘गद्दार’ आमदार म्हणत आहेत. दरम्यान, बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
अचलपूरचे आमदार बच्चू कडू म्हणाले की, “काहीजण आम्हाला गद्दार म्हणतात. बिलकूल आम्ही गद्दार आहोत. आम्ही नेत्यांचे गद्दार आहोत, जनतेचे नाही. असं म्हणत कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. बच्चू कडू म्हणाले की, हा बच्चू कडू नेत्यांची गुलामगिरी करणाऱ्यातला नाही.”
हे ही वाचा >> Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू
कार्यकर्त्यांना दिला निष्ठेचा मंत्र
दरम्यान, यावेळी बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना निष्ठेचा मूलमंत्रदेखील दिला. कडू म्हणाले की, “तुम्ही नेत्यांवर निष्ठा ठेवू नका. बच्चू कडूंवर निष्ठा ठेवू नका. कोणत्याही पक्षावर ठेवू नका. केवळ तुमच्या वडिलांवर निष्ठा ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांवर निष्ठा ठेवा.”