आगामी येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीनंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदी 'ब्राह्मण' समाजाचा मुख्यमंत्री बसावा अशी आमची इच्छा असून त्याकरिता भाजपाला पूर्ण समर्थन करणार असल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. रामदास आठवले मिरा रोड येथे बौद्ध विहार आणि विपश्यना केंद्राच्याच्या लोकार्पण कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी याबाबत भाष्य केले. राज्यात शिवसेना पक्षाने मोठी चूक करून राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षासह सरकार स्थापन केले आहे. मात्र हे सरकार आगामी येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा सत्तेत येणार नसून बहुमताने भाजपा व आरपीआय पक्षाचे सरकार येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे यावेळी ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री बसावा याकरता आपले पूर्ण समर्थन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच देवेंद्र फडवणीसच हे या पदासाठी योग्य असून ते बहुजन समाजाबरोबर मराठा समाजाचे देखील नेते आहेत, असे त्यांनी नमूद केले. त्याच प्रकारे त्यांनी बौद्ध धर्मानुसार 'भगवा' रंग हा शांततेचा प्रतीक असून त्यानुसार राज्यात शांतता स्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी “राज ठाकरे हे हिंदू असल्यामुळे त्यांनी आवर्जून अयोध्या दौरा केला पाहिजे. मात्र हा अयोध्या दौरा करण्यापूर्वी त्यांनी काही वर्षांपूर्वी मराठीच्या मुद्यावरून जो उत्तर भारतीयांना जो त्रास दिला आहे त्यामुळे आज ही मुंबई व त्या लगत राहणारा उत्तर भारतीय नागरिक नाराज आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी सर्वप्रथम अशा सर्व उत्तर भारतीयांची माफी मागावी व त्यानंतरच अयोध्या दौरा करावा,” असे रामदास आठवले म्हणाले.