भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना व शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी भाजपावर केलेल्या टीकेला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मराठी माणसाचा व नव्या शिवसेनेचा संबंध काय? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच, मराठीचे खरे मारेकरी ही पेंग्विनची सेना असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.

या संदर्भात नितेश राणे यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, नव्या शिवसेनेचा आणि मराठीचा संबंध काय? आधी मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार केला. मराठीचे खरे मारेकरी ही पेंग्विनची सेना, बाळासाहेब यांची सेना आहे कूठे? मराठी माणसाची संघटना म्हणे..मग..बेस्टच्या जागा – कनाकीय, बीएमसी कॉन्ट्रॅक्ट – दिनो, रात्रीच्या पार्ट्या – पटानी ..कपुर .. जॅकलीन, इथे कुठे शाखा प्रमुख दिसत नाहीत ? मराठी माणूस दिसत नाही ?

“महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे, पण..त्याची सुरुवात तुमच्या मालकाच्या ‘कलानगरातून’ करा..”

तसेच, शिवसेनेतील बाटग्यांचे महामंडळची यादी तशी लांब आहे.. पण थोडी माहिती साठी.. – सचिन आहीर – बीकेएसची जबाबदारी, राहुल कनाल – शिर्डी संस्था, आदेश बांदेकर – सिद्धिविनायक संस्था, उदय सामंत – कॅबिनेट मंत्री, अब्दुल सत्तार – मंत्री, प्रियांका चतुर्वेदी – खासदार, यादी मोठी आहे..इथे कुठेही डाके..रावते..रामदास कदम..शिवतारे..राजन साळवी, सुनील शिंदे या सारखे जुने सैनिक दिसणार नाहीत..स्वतः पवारांची लोम्बते होऊन चमकायचे आणि दुसऱ्यांना मोठी मोठी भाषण द्यायची!! असं देखील नितेश राणे यांनी ट्विटद्वारे म्हणत शिवसेना नेते संजय राऊतांवर जोरादार टीका केली आहे.

भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन संतापलेल्या शिवसेनेने भाजपावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच; असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे. बाटगे आणि शिखंडींच्या टोळ्या हाताशी धरून मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या कोण टाकत असेल तर मराठी माणूस त्या राजकीय बेवड्यांचा चोख बंदोबस्त केल्याशिवाय राहाणार नाही! तरीही अंगावर यायचे असेल तर या; अर्थात तेवढी मर्दानगी अंगात असेल तर अशा शब्दांत शिवसेनेने जाहीर आव्हान दिलं आहे. सामना संपादकीयमधून शिवसेनेने भाजवावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून नाचवले जात आहेत”; शिवसेनेचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

“शिवसेना भवन फोडू अशी भाषा भाजपमधील काही बाटग्या टिनपाट मंडळींनी करावी व व्यासपीठावरील मराठी पुढाऱ्यांनी त्यावर टाळ्या वाजवाव्यात ही महाराष्ट्र अस्मितेची गद्दारीच नाहीतर काय? शिवसेनेशी राजकीय मतभेद असणाऱ्या अनेकांनी शिवसेनेस वेळोवेळी आव्हाने दिली. शिवसेना त्या आव्हानांच्या छाताडावर चढून उभी राहिली, पण त्या राजकीय विरोधकांनीही कधी शिवसेना भवन फोडण्या-तोडण्याची भाषा केली नाही. जे स्थान मराठी जनांच्या हृदयात हुतात्मा स्मारकाचे आहे तीच प्रेरणा व भावना शिवसेना भवनाच्या बाबतीत सर्वच पक्षांतील मराठी लोकांत आहे,” असंही शिवसेनेने सांगितलं आहे