महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मला अनेकवेळा विचारलं जातं, आमदार बंडखोरी करणार आहेत हे तुम्हाला कळलं नव्हतं का? तर मी त्यांना सांगायचो, हो कळलं होतं. तर काहीजण विचारतात मग तुम्ही त्यांना थांबवलं का नाही? मी त्यांना म्हटलं कशासाठी थांबवू मी या लोकांना?" उद्धव ठाकरे म्हणाले की, "जी माणसं विकली गेली आहेत त्यांना सोबत घेऊन मी ही लढाई कशी लढू? मला ती विकली गेलेली माणसं नकोत, मला लढाऊ माणसं हवीत. ही विकली गेलेली माणसं शिवसैनिक म्हणायच्या लायकीची नाहीत. मी सर्वांना बोलावून स्पष्ट शब्दात सांगितलं, दरवाजा उघडा आहे. ज्यांना थांबायचं त्यांनी थांबा, बाकीच्यांनी निघून जावं." "माझा न्यायदेवतेवर विश्वास" उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, "आपण एकत्र आलो आहोत, त्यामुळे आपण सरकार स्थापन करू शकू. आपल्याला सरकार स्थापन करायचंच आहे. आमची सध्या न्यायालयीन लढाई सुरू आहे. माझा देवावर विश्वास आहे, माझ्या न्यायदेवतेवरदेखील तितकाच विश्वास आहे." हे ही वाचा >> “तुमच्या-माझ्यात फक्त एवढाच फरक, तुम्ही स्वभावाने…” देवेंद्र फडणवीसांच्या वाक्यावर अजितदादांची खळखळून दाद "न्यायदेवता लोकशाहीचं वस्त्रहरण होऊ देणार नाही" उद्धव ठाकरे म्हणाले की, "लोकशाहीचे चार स्तंभ असतात. त्यापैकी तीन स्तंभांची विल्हेवाट या लोकांनी लावलीच आहे. या तीनमध्ये प्रसारमाध्यमं देखील आहेत. पूर्वी पत्रकारांच्या हातात 'कलम' असायचं, आजकालच्या पत्रकारांच्या हातत 'कमल' आहे. लोकाशाहीचे तीन स्तंभ कोलमडलेले असताना चौथ्या स्तंभाकडून आम्हाला आशा आहेत. हा चौथा स्तंभ म्हणजे सर्वोच्च न्यायालय. मला खात्री आहे न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी असली तरी ही न्यायदेवता लोकशाहीचं वस्त्रहरण होऊ देणार नाही."