राज्य सरकार दुष्काळाचे राजकारण करीत आहे, हे राज्यातील जनतेचे दुर्दैव आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेस आंदोलन उभारणार आहे असे  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रयत्न आघाडी सरकारनेच केला होता. मात्र अवैध बांधकामे वाढवू नये, असे आवाहन त्यांनी केले. आदर्श आणि कॅम्पा कोलाचे प्रकरण वेगळे असल्याने त्याबाबत भाष्य करणे योग्य नाही, असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

राहाता येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला काँग्रेस प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनापूर्वी चव्हाण साई दर्शनासाठी शिर्डीत आले होते. येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील जनता दुष्काळाने होरपळली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चारा नसतानाही सरकार केवळ घोषणा करते. प्रत्यक्षात जनतेला सुविधा मिळत नाहीत. देशात आणि राज्यात कोणालाही राहण्याचा अधिकार आहे. रिक्षा हा सर्वसामान्यांचा रोजगार असून जो पात्र आहे. त्यांना परवाना द्यायला हरकत नाही. रिक्षा जाळण्याबाबत राज ठाकरेंचे वक्तव्य चुकीचे आहे. गुंडगिरी रोखणे हे सरकारचे कामच आहे. मात्र सरकारकडून तशी पावले उचलली जात नसल्याने राज्यातील जनता भयभीत आहे. सरकारने लोकांची ‘दिल की बात’ समजावून घेऊनच ‘मन की बात’ करण्याची भाषा वापरावी. काँग्रेस सरकारच्या काळातीलच अनेक निर्णय चांगले असतानाही त्यात त्रुटी काढण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करीत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. चव्हाण, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लोणी येथे दुपारी ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. औपचारिक गप्पा मारत राज्य व देशातील घडामोडींबाबत त्यांनी चर्चा केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र विखे यावेळी उपस्थित होते.