शिवसेना पक्षात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे उघड दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. बरं झालं घाण निघून गेली म्हणत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नव्याने शिवसेना उभारण्याचे शिवसैनिकांना आवाहन केले आहे. तर दुसरीकडे आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही दुसऱ्या पक्षात जाणार नाही, असे बंडखोर आमदारांच्या गटातील आमदार दीपक केसरकर यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बजावलेल्या नोटिशीला कधी उत्तर देणार, याबाबतही माहिती दिली आहे. आम्ही पूर्ण सात दिवसांचा कायदेशीर वेळ घेणार आहोत, असे केसरकर यांनी सांगितले आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हेही वाचा >>> ‘आमच्याकडे सगळे लोक, कशात विलीन व्हायचं ते त्यांनी ठरवावं’ बंडखोर गटातील दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

“मुळात नियमाप्रमाणे नोटीस काढल्यापासून सात दिवसांत उत्तर द्यायचं असतं. दोन दिवसांत उत्तर द्यायचं असतं असं कुठं आहे? आम्ही आमचा सात दिवसांचा कायदेशीर वेळ आहे तो मागवून घेऊ. त्यांनी चौधरी यांना गटनेते म्हणून मान्यता दिली आहे. या निर्णयाला आम्ही आव्हान देऊ. १६ लोक ५५ लोकांचा निर्णय घेऊ शकणार नाहीत. जी शिवसेना आहे ती आम्हीच आहोत; कारण आमच्याकडे सगळे लोक आहेत. उरलेल्या १४ लोकांनी आमच्याबरोबर यायचं की विलिनिकरण करायचं याचा त्यांनी विचार करावा,” असे दीपक केसरकर म्हणाले.

हेही वाचा >>> “बंड जास्त दिवस राहणार नाही, कारण…”; चंद्रकांत खैरेंचा बंडखोर आमदारांना निर्वाणीचा इशारा

तसेच “सध्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले ३९ आणि अपक्ष १२ असे एकूण ५१ आमदार आमच्याकडे आहेत. आम्ही शिवसेनेचे आहोत. आम्ही शिवसेनेतच राहणार. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गैरसमज लवकरच दूर होईल. पक्ष कमी होणार नाही तर तो वाढणार. संजय राऊत यांच्यासारखे कार्यकर्ते लोकांना भडकावत आहेत. लोक रस्त्यावर येत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या मायेचा हात एकनाथ शिंदेंच्या डोक्यावर फिरलेला आहे. अशा लोकांविरोधात तुम्ही जोडे मारो आंदोलन करणार का?” असा सवालही त्यांनी केला आहे.

हेही वाचा >>> नरहरी झिरवळ यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव अवैध? शिवसेनेच्या वकिलांनी सांगितली कायदेशीर बाजू, म्हणाले…

“जळवची माणसे का जात आहेत, यावर विचार केला पाहिजे. आम्ही सातत्याने पक्षप्रमुखांना सांगत होतो की निर्णय लवकर घ्या. कोणाच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल असंतोष नाही. त्यांच्याबद्दल आदर आहे. आम्ही जे करत आहोत हे शिवसेनेच्या भल्यासाठी आहे. यातून शिवसेना मोठी होणार आहे. राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत होती. शरद पवार यांनी चार वेळा शिवसेनेत फुट पाडलेली आहे. आता त्यांना शिवसेना अधिक संपवायची होती. अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत आघाडी झाली. उद्धव टाकरे मुख्यमंत्री होत होते म्हणून आम्हाला आनंद होता,” असेदेखील केसरकर म्हणाले.