दक्षिण सोलापूर तालुक्यातील आलेगाव येथे एका विवाहितेसह तिच्या दोन मुलांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार आत्महत्येचा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोनाली सिद्राम चोपडे (वय ३२) आणि तिची मुले संतोष (वय ८) व संदीप (वय ५) अशी मृत मायलेकांची नावे आहेत. सोनाली चोपडे ही मूळची तिल्हेहाळ (ता. दक्षिण सोलापूर) या गावची राहणारी होती. आलेगावात दयानंद वसंत शिंदे यांच्या शेतातील विहिरीत सदर महिलेसह दोन्ही मुले पाण्यात बुडाल्याचं समोर आलं. ग्रामस्थांना हे समजलं असता त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यांना बाहेर काढले असता तिघेही मृतावस्थेत आढळून आले. वळसंग पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.