वाई : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाका येथे कंटेनर आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवर मिरज येथून पुण्याला जाणारी महिला जागीच ठार झाली. कंटेनरने दुचाकीला फरफटत नेल्याने महिलेच्या शरीराच्या अक्षरशः चिंध्या झाल्या आहे. विद्या पटवर्धन (वय ६५, रा. सांगली) असे जागीच ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. हा अपघात सकाळी अकरा वाजता झाला आहे. पटवर्धन दाम्पत्य दुचाकीवरून मिरज येथून पुण्याकडे मुलाकडे निघाले होते. त्यावेळी दुचाकीला विरमाडे गावच्या हद्दीत कंटेनरने पाठीमागून धडक दिली. सुमारे वीस मीटर कंटेनरने दुचाकीला फरफटत नेले.अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.