गोंदिया तालुक्याशेजारील मध्य प्रदेशमधील बालघाट तालुक्यामधील किरणापूर शहरात एका महिलेने बालाघाटच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात चार मुलांना जन्म दिला आहे. ही शस्त्रक्रिया २३ मे रोजी रात्री ११:३० वाजताच्या सुमारास पार पाडली. बालाघाटच्या रुग्णालयामध्ये झालेल्या शस्त्रक्रियाने जन्मलेली ही चारही बाळं निरोगी आणि पुर्णपणे स्वस्थ असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.

जन्मलेल्या चार बाळांपैकी तीन मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. चारही बाळं निरोगी असून बालाघाट जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. सिव्हिल सर्जन कम हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. संजय धाबरगावे यांनी सांगितले की, सोमवार २३ मे रोजी किरणापूर तालुक्यातील जरही येथील प्रीती नंदलाल मेश्राम यांच्यावरील प्रसुतीच्या शस्त्रक्रीया झाली. प्रीती यांनी चार बाळांना जन्म दिला आहे.

ट्रॉमा युनिटच्या तज्ज्ञ पथकात डॉ. रश्मी वाघमारे आणि भूलतज्ज्ञ डॉ. दिनेश मेश्राम, परिचारिका सरिता मेश्राम आणि त्यांच्या कुशल पथकाने रात्री ११:३० वाजता २६ वर्षीय प्रीती यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या. प्रीती यांनी चार गोंडस बाळांना जन्म दिला. चारही बाळांना जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

सध्या चारही बालके निरोगी असून त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलंय. या बाळांना अद्याप तरी कोणतीही वैद्यकीय समस्या असल्याचं दिसून आलेलं नाही. या कार्यक्षम शस्त्रक्रियासाठी मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ.मनोज पांडे यांनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमचे अभिनंदन केले आहे.