जालना जिल्ह्यातील एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत या नैराश्यातून सदाशिव शिवाजी भुंबर या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना जालन्यातील परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडली आहे. दरम्यान, आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. “अनेकवेळा पाठपुरावा, आंदोलनं केली. मात्र शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. माझी सूचना आहे कि सरकारने आता तरी जागं व्हावं आणि याविषयात जातीने लक्ष घालावं”, असं म्हणत संभाजीराजे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. संभाजीराजे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सरकारवर हा निशाणा साधला आहे. त्याचसोबत, यावेळी त्यांनी मराठा समाजातील तरुणांना देखील एक आवाहन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिकाऱ्यांकडून सरकारची दिशाभूल!

“प्रशासनातील काही अधिकारी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारला अर्धवट माहिती देऊन सरकारची दिशाभूल करीत आहेत. मात्र, माझी सूचना आहे कि सरकारने आता तरी जागं व्हावं आणि याविषयात जातीने लक्ष घालावं. अधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी कार्यवाही सुरू करावी. त्याच, प्रमाणे, समाजाच्या इतर मागण्यांवर ठोस कार्यवाही करून तातडीने अंमलबजावणी करावी”, असं सांगत यावेळी संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांप्रश्नी सरकारला धारेवर धरलं आहे. “आरक्षण नाही, रोजगाराच्या संधी नाहीत, व्यवसायासाठी पाठबळ नाही यामुळे अनेक मराठा तरूण नैराश्यात जात आहेत. आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत. देशाचं भविष्य असणारी तरूण पिढी अशा परिस्थितीत जाणं हे राष्ट्रास हितकारक नाही”, अशी चिंता देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man commits suicide for maratha reservation sambhaji raje aggressive against uddhav thackeray gst
First published on: 16-09-2021 at 13:12 IST