क्षमाशीलतेचे महत्त्व का? सतत वेदनेचे ओझे वागवण्यातून क्षमाशीलता आपल्याला मुक्त करते. क्षमाशीलता आपल्याला आपले दु:ख विसरायला भाग पाडते, त्यामुळे आपल्याला अधिक बरे वाटून आपण पुन्हा नव्याने प्रेम मिळवू शकतो. आपल्या नकारात्मक भावनांची जाणीव होणे आणि नंतर क्षमा करणे यामुळे आपल्या समस्यांवर उपाय शोधण्याची आपली क्षमता वाढीला लागते. जेव्हा क्षमा करण्याच्या उद्देशाने आपण आपल्या भावनांचा वेध घेतो, तेव्हा आपण आपल्या जोडीदाराला दोष देण्याची परवानगी आपल्या मनाला देत नाही. जरी आपण आपल्या जोडीदाराला दोष देत राहिलो तरी चारही नकारात्मक भावना जाणवून किंवा त्या लिहून काढून शेवटी आपण दोषारोपाच्या भावनांमधून मुक्त होऊ शकतो. ज्या व्यक्तीला आपण दोष देत आहोत- प्रत्यक्ष त्या व्यक्तीबरोबरच आपल्या भावना वाटून घेतल्या तर दोषारोप व्यक्त करणाऱ्या विधानांमध्येच स्वत:ला व्यक्त करण्याची वृत्ती वाढीला लागते, भावना व्यक्त करणाऱ्या विधानांमध्ये नाही. आपल्या जोडीदाराबरोबर आपल्या भावना वाटून घेण्यात चुकीचे काहीच नाही, पण मोठय़ा खुबीने आपण अशी वेळ निवडली पाहिजे की तो आपले म्हणणे त्या वेळी ऐकून घेईल. आपला त्या बाबतीतला पूर्वानुभवही लक्षात घेतला पाहिजे व कोणत्या मर्यादेपर्यंत क्षमा करायची हेसुद्धा ठरवले पाहिजे. आपण ज्या व्यक्तीबरोबर आपल्या भावना वाटून घेत असू त्याच्यावर जर दोषारोप केले नाहीत तर आपण आपल्या जोडीदाराला क्षमा करण्याच्या पायरीपर्यंत लवकर पोहोचू. समोरची व्यक्ती आपल्याला कसा प्रतिसाद देते यावर तिला क्षमा करायची की नाही याची आपली तयारी म्हणजे युद्ध हरण्यासारखेच आहे. हे फक्त शिक्कामोर्तब करते की आपण आपल्या वेदनेसाठी कोणालातरी दोष देत आहोत, अन् तेही हे न बघता की त्याने किंवा तिने काही केले आहे किंवा केले नाही. जेव्हा आपल्या जोडीदाराकडे आपल्याला जे वाटते त्याची जबाबदारी नाकारण्याचे कुठलेही सयुक्तिक कारण नसते तेव्हाच ती आपले म्हणणे सकारात्मक रीतीने ऐकून घेते. ‘मला वाटते’ अशी सुरुवात करणारी स्थिती ही ‘तू’नी सुरुवात करणाऱ्या विधानांइतकीच दोषारोप करणारी असतात. आपण आपल्या भावनांच्या जाणिवांसाठी थोडा अधिक वेळ काढला आणि क्षमा केली तर दुसऱ्यांवर दोषारोप करण्याची आपली प्रवृत्ती जरा कमी होईल. आपल्या भावना दुसऱ्याला त्याच्या चुका न दाखवता व्यक्त करायला शिकलो तर आपला जोडीदार अधिक चांगला स्वीकार करेल. आपल्या भावना, गरजा, मागण्या आणि इच्छा या जोडीदाराशी वाटून घेण्यापूर्वीच जर आपण क्षमा करणे शिकलो तर आपल्या स्वभावात दोषारोपाचा दोष औषधलासुद्धा उरणार नाही. जोपर्यंत इतरांना कळत नाही की आपल्याला नेमके काय वाटते तोपर्यंत ते त्यांच्या वागणुकीत सुधारणा करणार नाहीत आणि आपल्याला कुठल्या प्रश्नाचा आधार पाहिजे हेसुद्धा त्यांना समजणार नाही. (मेहता पब्लिशिंग हाउसच्या ‘तुला आठवताना..’ मूळ लेखक जॉन ग्रे, अनुवाद शुभदा विद्वांस या पुस्तकातून साभार..)