‘या जोशीकाकू. मागच्या जवळपास दोन-अडीच वर्षांपासून इथे येतात, काकांना घेऊन. गणपती, दसरा, दिवाळी, राखी सगळे सण इथेच होतात त्यांचे. किती दिवस भांडणार त्या वरच्याशी? आम्हीच राखीला भाऊ  होतो त्यांचे, तर दिवाळीतील पहिला फराळसुद्धा इथेच करतात हे, आम्हा सर्वाबरोबर!’’

काही केल्या घडय़ाळाचे काटे पुढे सरकतच नव्हते. ‘आपल्याला हवं तेव्हा वेळ थांबत नाही’ आणि ‘वेळ थांबू नये असं वाटतं तेव्हा वेळ जाता जात नाही,’ या समीकरणाचा प्रत्यय येत होता आज, या डायलिसिस सेंटरच्या वेटिंग एरियामध्ये बसून! आईला नुकतंच आत नेलं होतं आणि आता पाच ते सहा तास असंच बसायचं होतं.. डॉक्टर आताच सांगून गेले होते तसं. ‘डायलिसिस म्हणजे नक्की काय करणार,’ हा केविलवाणा प्रश्न मनातच रेंगाळला, कारण आता कशाचीच माहिती करून घेण्याची मनाची तयारी नव्हती. मागच्या महिन्याभरात बऱ्याच गोष्टींची झालेली अर्धवट, पूर्ण माहितीच पुरेशी होती. आता अजून नवीन काही नको होते.
खिडकीतून बाहेर पाहिलं तर गणपतीचं देऊळ दिसत होतं, हॉस्पिटलच्याच आवारातलं. मी रोज येता-जाता बाहेरूनच ते देऊळ पाहत होते आणि आश्चर्य म्हणजे तरीही देव मला रोज भेटत होता. वेगवेगळ्या डॉक्टरांच्या रूपात. प्रत्येकावर तेवढाच विश्वास होता आणि अपेक्षाही. फरक इतकाच होता की मंदिरात मिळते तशी शांतता नव्हती इथे मनाला. होती फक्त भीती!
इतक्यात अचानक एक बाई समोर आल्या. अगदी सोज्वळ आणि सात्त्विक रूप. पिवळ्या रंगाची लाल काठाची साडी, केसात माळलेलं पिवळ्या चाफ्याचं फूल, हातभर भरलेल्या हिरव्या बांगडय़ा, त्यात चमकणाऱ्या पाटल्या, मणी मंगळसूत्र आणि कपाळावर लावलेलं कोरडं ठसठशीत कुंकू. एकदम लाघवी सौंदर्य. मी काही बोलायच्या आधीच त्या म्हणाल्या, ‘ही तीळगुळाची वडी घे, चिक्कीच्या गुळाची आहे. घरी बनवलेली. तिळगूळ घे आणि गोड बोल.’ काही बोलण्याच्या आधीच हातावर वडी ठेवून त्या गेल्यासुद्धा. खूप वेळ मी त्या वडीकडे एकटक पाहत राहिले. या वर्षी संक्रांत अशी भेटली मला, इथे!
काऊंटरवरच्या काकांच्या आवाजामुळे मी दचकले आणि पाहिले तर त्याच काकू त्यांना तिळगूळ देत होत्या, ‘तुमच्यासाठी मुद्दाम मऊ वडी आणली आहे.’ काका म्हणाले, ‘का? माझे दात तर अजून शाबूत आहेत, ती चिक्कीची वडी द्या मला.’ ‘घ्या हो तुम्ही दोन्ही घ्या’, असं म्हणून त्यांनी दोन्ही वडय़ा काकांना दिल्या. त्यानंतर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला, डॉक्टर्सना, सिस्टर्सना, तिथे बसलेल्या रुग्णांच्या सर्व नातेवाइकांना त्यांनी तिळगुळ वाटला. शेवटी ‘झालं माझं हळदी-कुंकू’ असं म्हणत समाधानाने अगदी समोरच बसल्या.  इतका वेळ चालू असणारा त्यांचा तोंडाचा पट्टा आता तरी थांबेल, असं वाटत असतानाच बाजूला बसलेल्या इतर चारचौघींबरोबर गुळाची पोळी व वडय़ांची रेसिपी, साडय़ांचा सेलपासून सुरू झालेली त्यांची चर्चा आता इतर रुग्णांच्या चौकशीपर्यंत येऊन पोचली होती.
मला खरं तर खूप त्रास होत होता या सर्वाचा. आपण कोठे आहोत आणि हे काय चालू आहे? वाटत होतं, त्यांना सांगावं की, ‘प्लीज थोडं गप्प बसा हो, खूप त्रास होतोय,’ पण काहीच बोलू शकले नाही. मुक्यानं सर्व पाहत राहिले. जणू काही दिवसांपासून मुक्यानेच जगायला शिकले होते.
इतक्यात समोरून येणाऱ्या डॉक्टरांना पाहून थोडा धीर आला. त्या वातावरणाची सवय त्यांना होती पण माझं काय? माझा चेहरा पाहून त्यांना अंदाज आला असावा. ‘अगं बस, बस,’ असं म्हणत बाजूलाच बसले ते. त्यांना पाहून त्या काकू परत आल्या आणि डॉक्टरांना तिळगूळ देऊन त्यांचीच चौकशी करून गेल्या. आता मात्र मी खूपच अस्वस्थ झाले. माझी ती अवस्था पाहून डॉक्टर म्हणाले, ‘या जोशीकाकू. मागच्या जवळपास दोन-अडीच वर्षांपासून दर दोन दिवसाआड इथे येतात, काकांना घेऊन. पाच ते सहा तास मग इथेच असतात. बाकी सर्वाची पण परिस्थिती काही वेगळी नाही, कोणी मागचे सहा महिने, कोणी वर्षभर, कोणी दोन वर्षांपासून येताएत इथे. आपापल्या रुग्णांना घेऊन. गणपती, दसरा, दिवाळी, राखी सगळे सण इथेच होतात त्यांचे. किती दिवस भांडतील त्या वरच्याशी. शेवटी आपापला आनंद शोधलाय त्यांनी, परिस्थितीशी जुळवून घेतलंय. आम्हीच राखीला भाऊ  होतो त्यांचे, तर दिवाळीतील पहिला फराळसुद्धा इथेच करतात हे, आम्हा सर्वाबरोबर! इथे येणारा प्रत्येक जण ओळखतो या जोशी काकूंना, सध्याच्या ‘सीनियर पेशंट रिलेटिव्ह’ आहेत त्या.’ हे ऐकून मी थक्कच झाले. त्या इतक्या सहजपणे वावरणाऱ्या चेहऱ्यामागे इतकं काही दाटलं होतं आणि मला मात्र स्वत:चं दु:ख कुरवाळताना समोरचं जग दिसतच नव्हतं.
परिस्थिती माणसाला बदलवते आणि इथे तर या सर्वानी त्यांच्या प्रयत्नांनी परिस्थितीच बदलवली होती पण हार नव्हती मानली. कोणाचे किती क्षण उरलेत याचा हिशेब न मांडता हे सगळे लोक आल्या क्षणाला आनंदाने सामोरे जात होते.. सांगून डॉक्टर माझा निरोप घेऊन गेलेही आणि मी मात्र जोशीकाकूंमध्ये अडकले..
kavitasahasrabudhe@yahoo.co.in