ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता मेढेकर यांच्यासह नामवंत कलाकारांच्या अभिनयाने सजलेली ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ ही नाटय़कृती ४०० भागांचा टप्पा पूर्ण करत आहे. यानिमित्ताने ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी या लग्नाच्या गोष्टीचा ‘स्वागत समारंभ’ आयोजित केला आहे. रविवारी (आज) मुलुंड येथील कालिदास नाटय़ मंदिर येथे नाटय़प्रयोगानंतर हा सोहळा पार पडेल. ‘लग्नाची गोष्ट सांगितली तर त्याचा स्वागत समारंभही व्हायला हवा’ अशी संकल्पना ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी प्रशांत दामले यांच्यापुढे मांडली. त्यातूनच हा सोहळा साकारत आहे. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाने मार्चमध्ये राज्यभर दौरा करून ४०० प्रयोगाचा टप्पा गाठला. करोनाच्या प्रतिकूल परिस्थितीतही हे धाडस केल्याने हा गौरवसोहळा आहे. करोनाचे सर्व निर्बंध पाळून २१ मार्चला मुलुंड येथील कालिदास नाटय़गृहात दुपारी ४.३० चा प्रयोग झाल्यानंतर हा स्वागत समारंभ होईल. महाराष्ट्र राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक आणि एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर हे या सोहळ्याचे प्रमुख अतिथी असणार आहेत. मुंबईत १९९३ च्या बॉम्बस्फोटावेळी दादर स्थानकाबाहेर स्कूटरमध्ये लपवून ठेवलेला जिवंत आरडीएक्स बॉम्ब निकामी करणारे मेजर वसंत जाधव (नि.) यांचा विशेष सन्मान हे या सोहळ्याचे वैशिष्टय़ आहे. जाधव यांचे हे योगदान आजपर्यंत दुर्लक्षित होते. त्याची दखल माध्यमांनी घेतली. अशा थोर व्यक्तिमत्त्वाचा आपणही सन्मान करावा या उद्देशाने त्यांना गौरविण्यात येणार आहे. नाटकाचा ४०० वा प्रयोग पुण्यात झाला. परंतु ज्या नाटकाचा जन्म मुंबईत झाला, ज्या नाटकाचे सर्वात जास्त प्रयोग मुंबईत झाले, त्या नाटकाचा ४०० वा प्रयोग वाढदिवस म्हणून मुंबईतही साजरा झाला पहिले. सध्या कोरानामुळे तणावाचे वातावरण असताना अशी नाटय़मय हास्यलस देणाऱ्या नाटकांची आपल्याला गरज आहे. अशोक मुळ्ये, ज्येष्ठ रंगकर्मी