स्टार प्रवाह वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ सध्या ही मालिका एका वेगळ्या वळणावर आहे. या मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध आणि संजना हे कालाकार चर्चेत आहे. अरुंधतीला लग्नाच्या २५व्या वाढदिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनिरुद्ध आणि संजना यांच्या अफेअर विषयी समजते. त्यानंतर अरुंधतीला धक्का बसतो पण या धक्यातून तिने स्वत:ला सावरले आहे. आता अरुंधती, अनिरुद्ध आणि संजना यांचे नाते कुटुंबासमोर आणणार आहे.

‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनिरुद्ध आणि संजना यांच्या नात्याविषयी कळाल्यानंतर अरुंधतीला धक्काच बसतो. त्यानंतर तिने स्वत:ला वेळ द्यायचे ठरवले आहे. ती घरातील कामे करुन तिला आवडत असलेल्या गोष्टी करताना दिसत आहेत. पण आई आणि अप्पांना अरुंधतीमध्ये इतका बदल कसा झाला हा प्रश्न पडला आहे.

दरम्यान, अनिरुद्ध संजनाला घेऊन फिरायला जातो. तो कुटुंबीयांना कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगतो. तर दुसरीकडे अरुंधती कुटुंबीयांसोबत फिरायला जायचा प्लॅन करते आणि अनिरुद्ध-संजना थांबलेल्या हॉटेलमध्ये राहायला जाते. आता कुटुंबीयांसमोर अनिरुद्ध आणि संजनाचे नाते येणार का? अप्पा आणि आई हा धक्का पचवू शकतील का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. येत्या ३ नोव्हेबरच्या विशेष भागात प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत.