'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू नुकतीच 'कागर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. पहिल्याच चित्रपटातून रिंकूने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता. अशा या रिंकूला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने बहुमोलाचा सल्ला दिला आहे. इतकंच नव्हे तर आमिरने रिंकूच्या अभिनयाचं कौतुकसुद्धा केलं. रिंकूने 'फेमसली फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'आमिर खान यांच्याशी बोलताना माझ्याकडे शब्दच नव्हते. त्यांच्या प्रश्नांना काय उत्तरं देऊ हेच मला कळत नव्हतं. पण मी हिंमत एकवटून त्यांच्याशी बोलले. त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. तसेच माझ्याशी बोलताना त्यांनी मला एक खूप छान सल्ला दिला. ते म्हणाले, कितीही प्रसिद्धी मिळाली तरी त्याने भारावून जायचं नाही. मी एका छोट्याशा गावातून आलेय. पण मला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. पण मी यापुढे देखील खूप मेहनत घेतली पाहिजे. तसेच प्रामाणिकपणे आणि व्यावसायिक पद्धतीने वागलं पाहिजे असेही त्यांनी मला सांगितले.' आमिरचा हा सल्ला रिंकूसाठी लाखमोलाचा असल्याचे ती सांगते. 'सैराट'नंतर 'कागर' हा रिंकूचा दुसरा चित्रपट आहे. ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण, आजच्या समाजकारणाचे वास्तववादी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.