बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार याने गेल्या काही वर्षांमध्ये जी प्रसिद्धी मिळवलीय त्याबद्दल वर्णन करण्यासाठी शब्दही कमी पडतील असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. सुपरस्टारने भव्य चित्रपटातच काम करण्याची प्रत्येक वेळेस गरज नसते हे त्याने दाखवून दिलेय. ‘टॉयलेट एक प्रेम कथा’सारखा विषयाला धरून असलेला चित्रपट करूनही तुम्ही नावलौकिक मिळवू शकता हे त्याने सिद्ध केलेय. ९०च्या दशकात अॅक्शन हिरो म्हणून प्रसिद्ध असलेल्या अक्षयने स्वतःमध्ये बरेच बदल घडवून आणले आहेत हे नाकारता येणार नाही. त्याला आता योग्य दिशा सापडली असून, गेल्या तीन-चार वर्षांमध्ये त्याने एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अक्षयइतका अफलातून बदल कोणत्याच बॉलिवूड अभिनेत्याने स्वतःमध्ये घडवून आणला नसल्याचे सलमान खानचे वडील सलीम खान यांनी म्हटलेय.

वाचा : EXCLUSIVE उर्मिला सांगतेय गरोदरपणातील तिच्या अनुभवाबद्दल..

एका मुलाखतीत सलीम खान म्हणाले की, ‘एक अभिनेता म्हणून अक्षयने स्वतःमध्ये जो काही बदल घडवून आणला आहे तो अद्याप कोणत्याच अभिनेत्यात दिसला नाही. त्याचा आतापर्यंत प्रवास कल्पनेच्या पलीकडे आहे. तो कोणत्याही विषयावरील चित्रपटात काम करू शकतो. अजय देवगण, आमिर खान, सलमान खान या अभिनेत्यांच्या कामातही बदल आलाय. पण अक्षयसारखी सुधारणा कोणीही केलेली नाही, हे खरंसुद्धा आहे.’ बॉक्स ऑफिसवरील गणित बदलण्यात अक्षयचा खूप मोठा वाटा आहे आणि साहजिकच याचे श्रेय त्याच्या अभिनय कौशल्याला जाते.

वाचा : लालबागच्या राजाच्या चरणी शंकर महादेवन नतमस्तक

दरम्यान, या वर्षात प्रदर्शित झालेले सलमान आणि शाहरुखचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. त्याबद्दल सलीम खान म्हणाले की, ‘यामागचे कारण अगदी सरळ आहे, ते म्हणजे आम्ही वाईट चित्रपट प्रदर्शित करतोय. कारण आपल्याकडे चांगल्या पट्टीचे लेखक नाहीत आणि त्यामुळेच लोक वाचन विसरले आहेत. आमच्या वेळी वाचनाला फार महत्त्व होते. तसेच, प्रत्येकजण दुसऱ्याला एकतरी पुस्तक वाचण्याचा सल्ला द्यायचेच. आम्ही पुस्तकांच्या दुकानात जायचो आणि सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक घ्यायचो. त्याचसोबत इतर विषयांवरील पुस्तकही वाचायचो. आता तर कित्येक लोक स्वतः सबस्क्राइब केलेले वृत्तपत्रही वाचत नाहीत. बऱ्याचदा सलमानच्या घराजवळून जाताना (सलमान तळमजल्यावर राहतो तर त्याचे कुटुंब पहिल्या मजल्यावर राहते) त्याचा दरवाजा ठोकतो आणि नोकरांना दरवाजाबाहेर पडलेली वृत्तपत्रे घरात घ्यायला सांगतो.