बॉलिवूड सुपरस्टार  अमिर खान आणि ऋतिक रोशन यांनी उत्तराखंड पूर पीडितांसाठी प्रत्येकी २५ लाख रुपये मदतनिधीमध्ये जमा केले.
“संकट काळामध्ये प्रत्येकाने इतरांना मदत केली पाहिजे. प्रत्येकाने असा विचार करायला हवा व स्वत:पासून सुरूवात करायला हवी. बोलण्या पेक्षा चांगली उदाहरणे घालून दिल्यास, इतर लोकदेखील त्याचे अनुकरण करतील. जगात अनेक नकारात्मक घटना घडत असताना सकारात्मक बाबी लक्षात घ्यायला हव्यात.”, असे हृतिक म्हणाला.
कृतिशील समाजसेवक म्हणून बॉलिवूडमध्ये ओळख असलेल्या अमिर खान याने उत्तराखंड पूरपिडीतांसाठी प्रथम निधीसंकलन करण्यास सूरूवात केली. अनेक स्वयंसेवी संस्थाच्या कामामध्ये भाग घेणाऱया अमिरने २५ लाख रुपये मदत निधी उत्तराखंड पूर पिडितांसाठी दिला. चित्रपट आणि दुरचित्रवाणी निर्माते यांच्याकडून गोळा झालेला निधी पंतप्रधान मदत निधीमध्ये जमाकरण्यात येणार आहे.
अमिरने पुढाकार घेत निधी संकलनास सूरूवात केल्या बद्दल ऋतिकने त्याचे अभिनंदन केले आहे. अमिरने सूरूवात केली व संपूर्ण चित्रपटसृष्टी या उपक्रमात सहभागी झाली.
मेंदूवर शस्त्रक्रीया करण्यासाठी जाण्याआधी मदतनिधीचा धनादेश अमिरकडे पाठवण्याची ऋतिकने व्यवस्था केली होती. चित्रपटसृष्टीने उत्तराखंड पूर पिडितांसाठी एकूण १ कोटी रूपये जमा केले असून, क्षत्रूघन सिन्हा आणि जावेद अख्तर यांनी खासदार निधीमधून प्रत्येकी ५ लाख रूपये मदतनिधीमध्ये जमा केले. शबाना आझमी आणि अनुपम खेर यांनी प्रत्येकी ५ लाख व त्यांच्या स्वयंसेवी संस्थेकडून १ लाख रूपये निधी पूर पिडितांसाठी दिला आहे.
एवढेच नाही तर, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सिने एम्पलॉईज संघटनेने देखील चित्रपट आणि दुरचित्रवाणी निर्माते संघटने सोबत उत्तराखंडमधील पूर व भूस्खलनामुळे उध्वस्त झालेल्या गावाच्या पुर्नवसनासाठी एक गाव दत्तक घेण्याची तयारी दाखवली आहे.