भारतीय संघाचे २०१९ विश्वचषक स्पर्धेतले आव्हान अखेरीस संपुष्टात आलेले आहे. केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चीत केले. २४० धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघ २२१ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताचे सर्व दिग्गज फलंदाज न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर ढेपाळले. या पराभवानंतर भारत विश्वचषक स्पर्धेत आपले स्थान बनवू शकला नाही. परंतु भारतीय संघांच्या खेळीची प्रशंसा सगळीकडे होत आहे. त्यामध्ये बॉलिवूड कलाकारही मागे नाहीत.

बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खानने भारतीय संघासाठी ट्विट केले आहे. ‘विराट आज आपल्याला नशीबाची साथ नव्हती. आज आपला दिवस नव्हता. माझ्यासाठी तर भारताने तेव्हाच विश्वचषक जिंकले होते जेव्हा भारताने उपांत्य फेरीमध्ये स्थान पटकावले होते. सामन्यात तू खूप मस्त खेळलास. जर काल पाऊस पडला नसता… तर कदाचित आज परिस्थीती काही वेगळी असती. पण खूप छान खेळलात. तुम्हा सर्वांचा आम्हाला अभिमान आहे’ असे आमिरने ट्विटमध्ये लिहिले आहे.

सध्या आमिर त्याचा आगामी चित्रपट ‘लाल सिंग चढ्ढा’मध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट प्रसिद्ध हॉलिवूडपट ‘फॉरेस्ट गम्प’चा अधिकृत रिमेक असल्याची घोषणा आमिर खानने केली होती. आमिर खान चित्रपटांमधून प्रेक्षकांचे केवळ मनोरंजनच करत नाही तर, त्या माध्यमातून कायमच तो प्रेक्षकांना एक संदेश देतो. नकळतपणे प्रेक्षक आमिरच्या प्रत्येक भूमिकेशी जोडले जातात. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर दिसणार असल्याच्या चर्चा सध्या सिनेसृष्टीत आहेत.