आमिर खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या तिस-या पर्वास रविवारपासून सुरुवात झाली. तिस-या पर्वाच्या पहिल्या भागात क्रिडा क्षेत्रावर चर्चा करण्यात आली. खेळ माणसाचे आयुष्य कसे बदलू शकतात यावरही प्रकाश टाकण्यात आला.
पहिल्या भागाच्या सुरुवातीला अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या अखिलेश कुमारच्या प्रेरणादायी कहाणीबाबत सांगण्यात आले. अखिलेशने फुटबॉल खेळण्यास सुरुवात केल्यावर अमली पदार्थांचे सेवन करणे तर सोडलेच पण लहान मुलांनाही फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर त्याने २०१० साली ब्राझील येथे झालेल्या होमलेस वर्ल्डकपमध्ये कर्णधारपद भूषविले होते. त्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणा-या कुस्तीपटू बबीता कुमारी आणि गीता कुमारी या दोघी बहिणीदेखील सहभागी झाल्या होत्या.
विशेष अतिथी म्हणून आलेल्या सायना नेहवालनेही तिच्या जीवनाबद्दल सांगितले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही या भागापासून प्रभावित झाला. त्याने कार्यक्रमादरम्यान फोन तर केलाच पण सोशल मिडियावरही कार्यक्रमाचे कौतुक केले.